Pandharpur,Pandharpur_2013_Ashad,Taie,NavNath,Aarti,
Pandharpur,Pandharpur_2013_Ashad,Taie,NavNath,Aarti,

आषाढी यात्रेच्या काळात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

pandharpur wari : वेतन आणि भत्ते लागू करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी आक्रमक

अभिराज उबाळे | पंढरपूर : श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते लागू करावेत यासाठी वारंवार मागणी करून सुध्दा दुर्लक्ष केल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. तात्काळ वेतन आणि भत्ते लागू न केल्यास ऐन आषाढी यात्रा कालावधीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत शुक्रवारी कर्मचाऱ्यांची बैठक श्री संत नरहरी सोनार मठ येथे झाली. या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.

वेतन आणि भत्ते लागू करण्याबाबत वारंवार मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच कार्यकारी अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन व समक्ष भेट घेऊन चर्चा केली होती.

प्रत्येकवेळी मंदिर समितीने कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते वाढवून देण्यास अनुकूल व सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले. याबाबत मंदिर समितीच्या 25 मार्चच्या सभेत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनास दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही मंदिर समितीने कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही केलेली नाही. तसेच सदरचे आश्वासन दिल्यानंतर मंदिर समितीची 12 मे रोजी सभा झाली. त्यामध्ये देखील मंदिर समितीने निर्णय घेतलेला नाही. यावरून मंदिर समिती कर्मचाऱ्यांना शासनाच्या स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करण्यास विलंब करीत असल्याचे दिसून येत आहे. या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांनी आता थेट ऐन आषाढी यात्रेच्या कालावधीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सदर बैठकीस श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील 100 कर्मचारी उपस्थित होते. 7 ते 30 वर्षे इतकी सेवा झालेले विविध संवर्गातील कर्मचारी मंदिर समितीच्या आस्थापनेवर तटपुंज्या वेतनामध्ये काम करीत आहेत. सध्या वाढती महागाई लक्षात घेता, मंदिर समितीने सकारात्मक निर्णय घेऊन मंदिर कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावेत अशी अपेक्षा कर्मचारी वर्ग व्यक्त करीत आहेत. वाढती महागाई व तटपुंज्या वेतनामुळे कर्मचाऱ्यांना घरखर्च भागविणे जिकीरीचे होत आहे. त्यामुळे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी समितीची बैठक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. आता समिती काय निर्णय घेते याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com