Operation Sindoor : 'स्कॅल्प क्षेपणास्त्र' Air Strike चा रिअल हिरो; 25 मिनिटांत 21 ठिकाणं केली उद्ध्वस्त
जम्मू - काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने 7 मे च्या पहाटे पाकिस्तानमधील 9 ठिकाणी हल्ला केला आहे. यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले आहे. या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले आहे. या हल्ल्यात भारताने वापरलेल्या शस्त्रांची महत्त्वाची भूमिका होती.
हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या तिन्ही सेवांच्या अचूक स्ट्राइक शस्त्र प्रणालींचा वापर करण्यात आला. यात लोटेरिंग शस्त्रांचा समावेश होता. गुप्तचर संस्थांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ल्यांबद्दल माहिती दिली होती. भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी स्कॅल्प क्षेपणास्त्राचा (Scalp missile) उपयोग केला. हे क्षेपणास्त्र राफेल विमानातून सोडण्यात आले. स्कॅल्प क्षेपणास्त्राचा वेग मॅक पॉइंट 8 आहे. ते 560 ते 600 किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. स्कॅल्प क्षेपणास्त्र किल वेब धोरणाचा एक भाग आहे. भारताकडे 300 हून अधिक स्कॅल्प क्षेपणास्त्रे आहेत.
या हल्ल्यात भारताने स्टँड-ऑफ शस्त्रे, ड्रोन आणि दारूगोळा तसेच इतर शस्त्रे वापरली. लष्कराच्या म्हणण्यानुसार, भारताने मध्यरात्री 1 वाजून 5 मिनीटांनी हा हल्ला केला. मध्यरात्री सुरु झालेला हा हल्ला 1.30 वाजेपर्यंत सुरुच होता. या 25 मिनिटांत पाकिस्तानात 21 ठिकाणी हल्ले करण्यात आले. दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं.