'ठाकरे कॉंग्रेसला माफी मागायला लावणार का?' देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहा?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्टला घडली. या घटनेमुळे संपुर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे विरोधकांकडून महाराष्ट्र सरकारवर टीका टीपणी केली जात आहे. यातच आज या घटनेचा निषेधात महाविकास आघाडीकडून मुंबईत जोडे मारो आंदोलन करण्यात येतं आहे. तुरुंगात टाकलं तरीही चालेल पण आंदोलन होणारच असा पवित्रा महाविकास आघाडीने घेतला आहे. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाबाबत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार व उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारले आहेत. देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता माध्यमांशी ते बोलत होते.
ते म्हणाले की, 'माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे, त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने मध्यप्रदेशमध्ये ज्या प्रकारे शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून तोडला, त्यावरती शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब मुग गिळून का बसले आहेत? कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी शिवरायांचा पुतळा का हटवला, याबद्दल ते का बोलत नाहीत?, या प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदा त्यांनी दिली पाहिजे.
आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. पण, महाराजांनी सूरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता, किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होतं. पण, सूरत कधी लुटली नव्हती, जणू काही सर्वसामान्य लोकांची लूट करायला महाराज गेले अशा प्रकारचा इतिहास काँग्रेसने आम्हाला इतकी वर्ष शिकवला, त्याला माफी मागायला सांगणार आहात का?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारला आहे. तसेच, केवळ खुर्ची करता त्यांचे मिंधेपण स्वीकारणार आहात का? हे तुम्ही सांगितलं पाहिजे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.
दरम्यान, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीने आज आक्रमक आंदोलन केले. राज्यभरात जोरदार आंदोलन झाले. यावेळी मुंबईत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला गेट ऑऊट ऑफ इंडिया असा इशारा दिला.