मुहूर्तशास्त्र
साईवास्तु विशेषमध्ये आज आपण आपल्या सर्वांसाठी उपयुक्त अशा "मुहूर्तशास्त्र" विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. खूपवेळा आपण अथक परिश्रम, नियोजन करून एखाद्या महत्त्वाच्या किंवा मांगलिक कार्याना सुरुवात करूनही पाहिजे तसं यश प्राप्त होत नाही. तर, काही काम सहज मनात येतं आणि केलं जातं, त्याला अनपेक्षित यश मिळतं. प्रत्यक्षात तुमच्या ग्रहांची जन्मपत्रिकेतील आणि गोचरितील स्थिती जेवढी कारणीभूत असते, तेवढीच ते कार्य सुरू करण्याची वेळ त्याचे अंतिम परिणाम ठरवत असते. ते कार्य सुरू करण्याचा आरंभबिंदू म्हणजेच मुहूर्त होय.
हिंदूशास्त्रात मुहूर्तशास्त्र "तिथी, वार, योग, नक्षत्र आणि करण" या पांच अंगानी पाहिलं जातं, म्हणूनच आपण त्याला "पंचांग" म्हणतो. पंचांगाचा प्रत्येक पैलू आपल्या कार्याचं स्वरुप ठरवत असतो. पाच तिथि, सात वार, सत्तावीस नक्षत्र, सत्तावीस योग आणि अकरा करण यांचा विचार करून योग्य मुहूर्त ठरवला जातो.
पूर्वीच्या काळी चौघडिया फक्त प्रवास सुरू करताना पाहिली जाणारी वेळ म्हणूनच पाहिली जात होती. पण आज आपण बरेचजण मोबईल ऍपमध्ये चौघडिया पाहून दिवसाचा शुभ काळ ठरवणं चुकीचं आहे. दिवसाचे दिनमान आणि रात्रिमान अशा प्रभागात मुहूर्त काढताना त्या दिवसाचा राहूकाल, यमघण्ट, गुलिक, दूरमुहूर्त, अभिजातमुहूर्त, गोधुलितमुहूर्त, होरामुहूर्त, ताराचक्र, सर्वतोभद्रचक्र, द्विपुष्कर, त्रिपुष्कर, पंचक, सिद्धी, अमृतसिद्धी योग तसेच त्रिकदोष, धनुर्मास, नक्षत्र, वारांमध्ये केली जाणारी कार्य आणि लग्न गण्डांत योग, नक्षत्र गण्डांत योग, तिथी गण्डांत योग पाहिले जातात.
आपल्या हिंदू संस्कृतीत कुठलेही शुभ, मांगलिक कार्य आणि धार्मिक विधी सुरू करताना तसेच मनुष्याच्या आयुष्यात होणाऱ्या षोड़श (सोळा) संस्कार करताना प्रारंभ समयाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मुहूर्त पाळण्याचा अट्टाहास फक्त थोरामोठ्यांचाच नसून तरुणवर्गाचा सुद्धा असावा.
प्रत्येक व्यक्तीला योग्य अनुकूल ग्रहमान लाभले असेलच, असे नाही; परंतु आपल्या कुवतीनुसार योग्य मुहूर्त पाळून केली जाणारी शुभकार्य नक्कीच तुम्हाला विशेष अनुभूती देतील, यात शंकाच नाही.

