Mahashivratri : महाशिवरात्री का साजरी केली जाते? काय आहे त्या मागची पौराणिक कथा
महाशिवरात्री हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. यंदा रविवार, 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. या दिवशी भाविक उपवास, रुद्राभिषेक, शिवपूजन आणि रात्रभर जागरण करून भगवान शंकरांची आराधना करतात. महाशिवरात्रीला मनोभावे पूजा केल्यास महादेवांची कृपादृष्टी लाभते आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.
पुराणातील कथेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. त्यामुळे हा दिवस शिव-पार्वती मिलनाचा शुभ क्षण मानला जातो. याशिवाय समुद्रमंथनाची कथाही महाशिवरात्रीशी जोडली जाते. देव आणि दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथन केले. या मंथनातून अनेक रत्न आणि दिव्य वस्तू प्रकट झाल्या; मात्र त्याचवेळी ‘हालाहल’ नावाचे अत्यंत विषारी विष बाहेर आले. या विषात संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याची क्षमता होती.
सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकरांनी हे विष प्राशन केले. विष पचवताना त्यांचा कंठ निळा पडला आणि ते ‘नीलकंठ’ म्हणून ओळखले जाऊ लागले. विषाच्या तीव्रतेमुळे त्यांच्या देहात दाह निर्माण झाला. देवांनी रात्रभर भजन, कीर्तन आणि नृत्य करून त्यांना जागे ठेवले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल. भगवान शंकरांनी तांडव नृत्य करून विश्वातील संतुलन राखले. सकाळी त्यांची प्रकृती सुधारली आणि त्यांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या घटनेच्या स्मरणार्थ महाशिवरात्री साजरी केली जाते.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरांमध्ये मोठी गर्दी दिसून येते. विशेषतः देशातील बारा ज्योतिर्लिंगांमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी एकत्र येतात. या दिवशी भक्त बेलपत्र, धतूरा, दूध, मध आणि गंगाजल अर्पण करतात. १०८ बेलपत्र वाहून ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी शिवलिलामृत पारायण, महारुद्र आणि कीर्तनांचे आयोजन केले जाते. रात्रभर जागरण करून भक्त भगवान शंकरांचे नामस्मरण करतात. महाशिवरात्रीला काही शुभ संकेत दिसल्यास ते सौभाग्याचे लक्षण मानले जाते.
शिवलिंगावर अखंड जलधारा, मंदिरात घंटानाद किंवा ध्यान करताना शांतता अनुभवणे यांना आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्व दिले जाते. एकूणच, महाशिवरात्री हा केवळ उत्सव नसून श्रद्धा, त्याग आणि विश्वकल्याणाचा संदेश देणारा दिवस आहे. भगवान शंकरांनी हालाहल विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले, याची आठवण करून देणारा हा पवित्र दिवस भक्तांसाठी आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीची संधी ठरतो.
