
बदलती जीवनशैली आणि सततची कामाची धावपळ याचा थेट परिणाम शरीरावर आणि मनावर होतो. जास्त ताण, अपुरी झोप आणि चुकीच्या सवयींमुळे थकवा पटकन जाणवू लागतो. दिवसभर खुर्चीत बसून काम केल्याने फक्त अंगच नाही तर मनही दमून जातं. संपूर्ण आठवडा धावल्यावर सुट्टीच्या दिवशी काहीच करावंसं वाटत नाही. मात्र फक्त झोपून राहिलं तर आळस वाढतो. अशावेळी स्वतःसाठी थोडा वेळ काढणं खूप गरजेचं असतं. लहान-लहान बदल केले, तरी शरीरात पुन्हा चैतन्य येतं. सुट्टीचा दिवस योग्य पद्धतीने वापरला, तर थकवा कमी होतो, मन हलकं होतं आणि पुढील आठवड्यासाठी नवी ऊर्जा मिळते. स्वतःकडे लक्ष देणं ही चैन नाही, तर गरज आहे.
आठवडाभराच्या कामाच्या गडबडीत स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. सुट्टीच्या दिवशी आवडती पुस्तकं वाचा, गाणी ऐका किंवा एखादी कला जोपासा. मन हलकं होतं आणि मूड आपोआप चांगला होतो.
दिवसभर झोपून राहण्यापेक्षा थोडं चालणं, स्ट्रेचिंग किंवा योगा करा. शरीर मोकळं होतं आणि आळस पळून जातो. थोडासा घामही ऊर्जा वाढवतो.
घरात बसून कंटाळा येतो. जवळच्या बागेत, टेकडीवर किंवा मोकळ्या जागी फिरायला जा. हिरवळ आणि ताजी हवा मन शांत करते.
कोमट पाण्याने अंघोळ, हलका मसाज किंवा स्पा घेतल्याने अंगातील ताण निघून जातो. स्नायू सैल होतात आणि शरीर रिलॅक्स होतं.
सुट्टी म्हणजे स्क्रीनपासून सुटका. काही तास फोन आणि लॅपटॉप बाजूला ठेवा. डोळे, मेंदू आणि मन—तिघांनाही खरी विश्रांती मिळते.