AsiaCup 2025 : ...तरीही त्याला संघात संधी! कॅप्टन दादाकडून 'या' खेळाडूबद्दल महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाला,
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर निवड समितीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल यांसारखे सातत्याने चांगली कामगिरी करणारे खेळाडू संघाबाहेर ठेवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे फक्त एकच टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या हर्षित राणाला थेट संधी मिळाल्याने चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
बीसीसीआयचे निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी 19 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन 15 सदस्यीय संघ जाहीर केला. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार असून शुबमन गिल उपकर्णधार असेल. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे गोलंदाजी विभागाला बळ मिळालं आहे. हर्षित राणाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याचं समर्थन केलं. “हर्षितने आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. त्याच्यात दमदार प्रदर्शनाची क्षमता आहे आणि आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे,” असं सूर्याने सांगितलं.
तथापि यूएईमधील संथ खेळपट्ट्यांमुळे हर्षितला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणं अवघड मानलं जात आहे. बुमराहसोबत अर्शदीप सिंहला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. हर्षितने आपल्या एकमेव टी20 सामन्यात तीन बळी घेतले होते.
दरम्यान, आशिया कपचे सामने टी20 फॉरमॅटमध्ये खेळवण्याचा निर्णय वर्ल्ड कप 2026 लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 15 सामन्यांतून भारतीय संघाला संयोजन ठरवण्याची मोठी संधी मिळणार आहे. श्रेयस अय्यरला वगळल्याने क्रिकेट वर्तुळात निवड समितीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.