Bengaluru Stampede : RCB ने केली नव्या उपक्रमाची घोषणा, बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; "हा उपक्रम चेंगराचेंगरीत..."

Bengaluru Stampede : RCB ने केली नव्या उपक्रमाची घोषणा, बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; "हा उपक्रम चेंगराचेंगरीत..."

जून 2025 रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाला, या घटनेनंतर तब्बल तीन महिन्यांनी आरसीबी व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

आयपीएल 2025 चे विजेतेपद मिळवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाचा पहिला ऐतिहासिक जल्लोष एका दुःखद घटनेने काळवंडला होता. 4 जून 2025 रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या जल्लोषादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाला, तर 33 जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर तब्बल तीन महिन्यांनी आरसीबी व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा शनिवारी अधिकृतपणे करण्यात आली.

आरसीबीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं की, "4 जून 2025 हा आमच्यासाठी फारच दुःखद दिवस ठरला. त्या दिवशी आम्ही आमच्या आरसीबी परिवारातील 11 सदस्य गमावले. ते फक्त चाहते नव्हते, तर आमच्या संघाचा, शहराचा आणि संपूर्ण समुदायाचा अविभाज्य भाग होते. त्यांची उणीव आम्हाला कायम भासेल."

संघाने पुढे म्हटलं की, "त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघू शकत नाही. मात्र, पहिल्या टप्प्यात आदर आणि सहानुभूतीच्या भावनेतून आम्ही त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत देत आहोत. ही केवळ आर्थिक मदत नसून करुणा, एकता आणि कायमस्वरूपी पाठिंबा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे."

या घोषणेसोबतच आरसीबीने ‘RCB Cares’ या दीर्घकालीन उपक्रमाचीही घोषणा केली आहे. संघाने स्पष्ट केलं की, हा उपक्रम चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या चाहत्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहत खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा राहील. "पुढचा प्रत्येक पाऊल आमच्या चाहत्यांच्या भावना, अपेक्षा आणि हक्कांचं प्रतिनिधित्व करेल," असं आरसीबी व्यवस्थापनाने म्हटलं आहे. यासंदर्भात आणखी तपशील लवकरच जाहीर केले जातील, अशी माहितीही संघाने दिली. याआधी 28 ऑगस्ट रोजी आरसीबीने पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट करत ‘RCB Cares’ची झलक दाखवली होती.

काय घडलं होतं 4 जूनला?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव करत ऐतिहासिक पहिलं विजेतेपद पटकावलं होतं. तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीने जेतेपद मिळवलं होतं. या अभूतपूर्व विजयानंतर संघाच्या चाहत्यांनी बंगळुरूमध्ये जल्लोष साजरा केला.

एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आणि बाहेर प्रचंड गर्दी उसळली. चाहत्यांचा उत्साह अनियंत्रित झाला आणि अचानक चेंगराचेंगरी झाली. यात 11 चाहत्यांचा मृत्यू झाला, तर 33 जण जखमी झाले होते. या घटनेमुळे संघाचा आनंदाचा क्षण काळवंडला आणि कुटुंबियांच्या आयुष्यात कायमची पोकळी निर्माण झाली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com