Mumbai Indians IPL 2025 : मुंबई इंडियन्सची साडेसाती काय कमी होईना! IPL चा 'तो' नियम पलटनवर पडू शकतो भारी
पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांमध्ये काल फायनलमध्ये धडक मारण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. यादरम्यान आरसीबीने 106 धावा करत 8 विकेट्ससह पंजाबला पराभूत केले आणि सरळ फायनलमध्ये उडी मारली आहे. यानंतर आता मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हे संघ मुल्लानपूरमध्ये एलिमिनेटर सामना खेळणार आहेत. यामध्ये जो संघ सामना जिंकेल तो क्वालिफायर 2 मध्ये आपलं स्थान निश्चित करेल, आणि पुढचा सामना पंजाबसोबत खेळेल. या सामन्यादरम्यान जो संघ विजयी होईल तो आरसीबी विरुद्ध फायनलमध्ये आमने सामने पाहायला मिळेल.
त्यामुळे एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. एलिमिनेटर सामन्याच्या दिवशी मुल्लानपूरमध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्याआधी एलिमिनेटर सामन्यात जर पाऊस पडला किंवा काही कारणास्तव हा सामना रद्द झाला तर याचा फटका मुंबई इंडियन्सला बसू शकतो. मुंबई इंडियन्ससाठी या एलिमिनेटर सामन्यादरम्यान काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
मुंबई इंडियन्स सध्या 16 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे, तर गुजरात टायटन्स 18 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, एलिमिनेटर सामन्यासाठी रिझर्व्ह डेचा पर्याय उपलब्ध नाही. एलिमिनेटर सामना रद्द झाल्यास पॉईंट्स टेबलवर जास्त गुणांसह वर असलेला संघ क्वालिफायर 2 सामन्यासाठी पात्र ठरेल. त्यामुळे जर एलिमिनेटर सामना रद्द झाला तर गुजरातचा संघ क्वालिफायर 2 मध्ये जाईल. तर मुंबई इंडियन्स कमी गुणांमुळे आयपीएल 2025 मधून बाहेर पडेल.