Owaisi on Ind vs Pak Cricket Match : "तुम्ही कोणत्या तोंडाने क्रिकेट खेळणार?" भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचवरून ओवैसीचा मोदींना प्रश्न
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गेले 2 दिवस ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली आहे. याचपार्श्वभूमिवर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. नुकतचं पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देश पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. ओवैसींनी भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचवरून मोदींसमोर थेट प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला आहे.
यादरम्यान असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, " मोदी स्वत: म्हणाले होते की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, त्यामुळे दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. मग बैसरन खोऱ्यात मारल्या गेलेल्या लोकांनंतर देखील सरकार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला परवानगी कसे देऊ शकतात?"
त्यानंतर पुढे पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या व्यापार बंदीच्या मुद्द्यावर बोलताना ओवैसी म्हणाले की, "जर त्यांच्या बोटींना आपल्या जलहद्दीत प्रवेश नाही, तर मग त्यांच्यासोबत भारतीय संघ क्रिकेट सामना कसा खेळू शकतो? जेव्हा तुम्ही रक्त आणि पाण्याच्या तत्त्वावर ठाम आहात, तर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचे धोरण कसे न्याय्य ठरू शकते? तुम्ही व्यापार थांबवला, त्यांच्या बोटी आमच्या पाण्यात येऊ शकत नाहीत, मग तुम्ही कोणत्या तोंडाने क्रिकेट खेळणार?" असं म्हणत ओवैसींनी केंद्र सरकारसमोर भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन मोदींना प्रश्न केले आहेत.