Vijay Mallya On RCB Win IPL Trophy: आरसीबीने IPL ट्रॉफी जिंकल्यानंतर विजय मल्ल्याची प्रतिक्रिया, पोस्ट करत म्हणाला...
(Vijay Mallya ) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा पराभव करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 190 रन्स केल्या. बंगळुरुनं पंजाबला 191 धावांच्या आव्हान दिलं होते. मात्र पंजाबला 185 धावांचीच मजल मारता आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पंजाबचा पराभव करुन पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीने आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. या विजयानंतर संपूर्ण बंगळुरु शहरात आनंदाचे वातावरण पसरले होते. ‘ई साला कप नमदे’च्या घोषणांनी बंगळुरु शहर गजबजले. आरसीबीच्या विजयानंतर जगभरातील आरसीबी चाहत्यांनी जल्लोष साजरा केला.
RCB च्या या ऐतिहासिक यशावर आरसीबीचा माजी मालक विजय मल्ल्या यानेही सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. विजय मल्ल्या म्हणाला की, 'जेव्हा मी RCB ची सुरुवात केली, तेव्हा माझं स्वप्न होतं की एक दिवस ही ट्रॉफी बंगळुरुला मिळावी. आज ते स्वप्न पूर्ण झालं आहे. मला विराट कोहलीला तरुणपणी निवडण्याचा मान मिळाला, आणि तो 18 वर्षे आरसीबीसोबत राहिला आहे हे उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांना संघात घेण्याचा सन्मानही मला लाभला. शेवटी, आयपीएल ट्रॉफी बेंगळुरूमध्ये आली. माझे स्वप्न साकार करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन आणि पुन्हा एकदा आभार. आरसीबीचे चाहते सर्वोत्तम आहेत आणि ते IPL ट्रॉफीसाठी पात्र आहेत. ई साला कप बंगळूरु नामदे'
2008 मध्ये RCB फ्रँचायझीची मालकी मल्ल्याने घेतली होती. मात्र नंतर आर्थिक गैरव्यवहारांमुळे त्याने भारत सोडला. 2016 मध्ये त्याने RCB संचालकपदाचा राजीनामा दिला होता. या ऐतिहासिक क्षणावर अनेक उद्योगपती, क्रिकेटप्रेमी आणि राजकीय नेत्यांनी RCB चे अभिनंदन करत सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला.