Cricket News : भारतविरुद्ध पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय! पाकिस्तानी खेळाडूंना परदेशी NOC वर बंदी
आशिया चषक 2025 मध्ये भारताने पाकिस्तानवर तिन्ही सामन्यांत विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने मोठा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्ध एकाही सामन्यात जिंकता न आल्याने पीसीबीने थेट आपल्या खेळाडूंवर कारवाई करत त्यांचे एनओसी (No Objection Certificate) निलंबित केले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी क्रिकेटपटूंना परदेशातील टी-20 लिग आणि फ्रँचायजी स्पर्धेत खेळता येणार नाही.
भारताविरुद्ध सलग पराभवानंतर पाकिस्तानातील चाहते आणि क्रिकेट बोर्ड प्रचंड नाराज झाले होते. भारताने दमदार प्रदर्शन करत सलग विजय मिळवला, ज्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट व्यवस्थापनावर मोठा दबाव आला. परिणामी, खेळाडूंच्या परदेशातील करारांवर गदा आली असून आता त्यांना केवळ आंतरराष्ट्रीय सामने आणि घरगुती क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीसीबीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सुमैर अहमद सैयद यांनी 29 सप्टेंबर रोजी यासंबंधी नोटीस जारी केली. या नोटीसमध्ये खेळाडू आणि त्यांच्या एजंटांना स्पष्टपणे कळविण्यात आले की, परदेशी लिगमधील सहभागाला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
पाकिस्तानी खेळाडूंना परदेशी टी-20 लिगमध्ये खेळून मोठे आर्थिक लाभ मिळत होते. मात्र, एनओसी निलंबित झाल्याने त्यांचा हा मार्ग बंद झाला आहे. बोर्डाच्या या निर्णयामुळे खेळाडूंमध्ये नाराजी असली तरी पीसीबीचा भर राष्ट्रीय संघाच्या कामगिरीवर आहे.
या निर्णयानंतर पाकिस्तानचा क्रिकेट संघ केवळ घरगुती आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच आपली ताकद आजमावणार आहे. भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी लागल्याचे स्पष्टपणे दिसत असून, या कारवाईमुळे पाकिस्तानच्या क्रिकेट जगतात मोठी खळबळ माजली आहे.