PM Narendra Modi : भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली 'ही' पोस्ट
थोडक्यात
भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून शानदार विजय मिळवला
सामन्यानंतर देशभरात आनंदसोहळा सुरू झाला
भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं
(PM Narendra Modi) दुबईत झालेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने एकूण नवव्यांदा आशिया कपवर आपलं नाव कोरलं. सामन्यानंतर देशभरात आनंदसोहळा सुरू झाला असून, सोशल मीडियावरही या विजयाची जोरदार चर्चा होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संघाचे अभिनंदन करत ट्विट केले. त्यांनी लिहिले, “ऑपरेशन सिंदूर असो किंवा खेळाचे मैदान निकाल एकच,भारताचा विजय.” त्यांच्या या संदेशाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 147 धावा उभारल्या. त्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काहीशी डळमळीत झाली.
दुसऱ्या षटकातच अभिषेक शर्मा बाद झाला, तर कर्णधार सूर्यकुमार यादवही अपयशी ठरला. मात्र संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी डाव स्थिरावला. सॅमसन 24 धावांवर बाद झाला तरी तिलक वर्माने जबरदस्त खेळी करत संघाचा विजयाचा पाया भक्कम केला.
शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 10 धावा हव्या होत्या. अशा तणावपूर्ण परिस्थितीत रिंकू सिंगने विजयी फटका मारत सामना जिंकून दिला. तिलक वर्माने नाबाद 69 धावा करत (53 चेंडूत, 3 चौकार आणि 4 षटकार) या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याची ही इनिंग्स निर्णायक ठरली.
भारताने या विजयाने केवळ आशिया कप जिंकला नाही, तर पाकिस्तानवर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. मोदी आणि शाह यांच्यासह संपूर्ण देशभरातून संघावर कौतुकाचा वर्षाव होत असून, चाहत्यांच्या नजरेत तिलक वर्मा या अंतिम सामन्याचा खरा हिरो ठरला आहे.