IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचे भारताला विजयासाठी 270 धावांचे लक्ष्य
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील निर्णायक सामना आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात 269 धावांवर गारद झाला.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. तर भारताकडून गोलंदाजीत उपकर्णधार हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने ३-३ बळी घेतले. आता ही मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला 270 धावांचे लक्ष्य गाठायचे आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 68 धावांची शानदार भागीदारी करून चांगली सुरुवात केली. यानंतर हार्दिक पांड्याने हेडच्या रुपात पहिला बळी घेतला. तर, हार्दिक पांड्याच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथ खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. मिचेल मार्शच्या रूपाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला 85 धावांवर तिसरा मोठा धक्का बसला.
डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबुशेन यांच्यात चौथ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियन संघाचे ५ बळी घेतले. ऑस्ट्रेलिया निम्मा संघ अवघ्या 138 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. भारताकडून हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी गोलंदाजीत ३-३ तर अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजने २-२ बळी घेतले.