IND vs NZ 2nd Test Day 1 : मयंक अग्रवालचं शतक, भारताची 4 बाद 214 पर्यंत मजल
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामन्यात मयंक अग्रवालला सूर गवसला असून त्याने शतक ठोकले आहे. भारताने 70 षटकांमध्ये 4 गड्यांच्या बदल्यात 214 धावा केल्या आहेत. मयंक अग्रवालच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिला दिवस आपल्या नावे केला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र तोपर्यंत पहिलं सत्र वाया गेलं होतं. त्यामुळे आज केवळ दोन सत्र खेळवण्यात आली आहे. यामध्ये भारताने 70 षटकांमध्ये 4 गड्यांच्या बदल्यात 214 धावा केल्या आहेत. मयंक अग्रवालच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिला दिवस आपल्या नावे केला.
नाणेफेक जिंकून कर्णधाराने घेतलेला फलंदाजीचा निर्णय भारतीय सलामीवीरांनी योग्य ठरवला. मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. मात्र न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताची बिनबाद 80 वरुन 3 बाद 80 अशी अवस्था करुन ठेवली. त्याने आधी 44 धावांवर असलेल्या शुभमन गिलला बाद केलं. त्यानंतर एजाजने एकाच षटकात चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली या दोघांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. पुजारा आणि कोहली भोपळादेखील फोडू शकले नाहीत. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरलादेखील एजाजने फार वेळ मैदानात टिकू दिलं नाही. अय्यर 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या ऋद्धीमान साहाने पडझड होऊ दिली नाही. अग्रवाल आणि साहा या दोघांनी 5 व्या विकेटसाटी आतापर्यंत नाबाद 61 धावांची भागीदारी रचली आहे.