झिम्बाब्वेविरुद्ध भारताचा विजय, दीपक हुडाचा विक्रम
भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्धचा आणखी एक सामना जिंकला. एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने यजमान झिम्बाब्वेचा 5 विकेट्सने पराभव केला. अशा प्रकारे केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिका जिंकली. मात्र, हा सामना जिंकण्यासाठी संघाला मागील सामन्यापेक्षा थोडा जास्त संघर्ष करावा लागला. तरीही यश मिळाले. तसे पाहता संघाचा विजय निश्चित मानला जात होता.
इशान किशनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तोही बऱ्याच दिवसांनी मैदानावर उतरला होता. पण, तो ६ धावांवर बाद झाला. गिलसह त्याने ३४ धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन व दीपक हुडा यांनी ५६ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. हुडा २५ धावांवर बाद झाला. संजूने षटकार खेचून भारताचा ५ विकेट्स राखून विजय पक्का केला. त्याने ३९ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या.
भारतीय संघाने ५ विकेट्स व १४६ चेंडू राखून हा सामना जिंकला. पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट गमावून सर्वाधिक चेंडू राखून विजय मिळवण्याच्या विक्रमात आजचा निकाल अव्वल झाला. यापूर्वी १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने झिम्बाब्वेवरच १३५ चेंडू राखून विजय मिळवला होता. त्यानंतर १९९८ ( वि. बांगलादेश) व २००६ ( वि. इंग्लंड) यांच्याविरुद्ध अनुक्रमे १२४ व १२३ चेंडू राखून विजय मिळवला होता.

