ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी महिला भारतीय संघाची घोषणा, जाणून घ्या असा असेल संघ
महिला टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर आता विजेता ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. येत्या 11 डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. महिला टी-20 विश्वचषक 2023 च्या फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत आयोजित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत विश्वचषकापूर्वी ही मालिका दोन्ही संघासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी या दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. "भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही मालिका 11 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्याचबरोबर मालिकेतील शेवटचा सामना 20 डिसेंबरला खेळला जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने मुंबईत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यातील पहिले दोन सामने डीवाय पाटील स्टेडियमवर खेळले जातील. तर, उर्वरीत तीन सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडतील", अशी माहिती जय शाह यांनी दिली होती.
असा असेल भारतीय संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकिपर), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह ठाकूर, मेघना सिंह, अंजली सरवाणी, देविका वैद्य, एस मेघना, रिचा घोष (विकेटकिपर), हरलीन देओल.
नेट बॉलर- मोनिका पटेल, मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एसबी पोखरकर, सिमरन बहादूर