टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडाकेबाज एन्ट्री; श्रीलंकेवर 302 धावांनी विजय

टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडाकेबाज एन्ट्री; श्रीलंकेवर 302 धावांनी विजय

भारताने विश्वचषक स्पर्धेतील 7 पैकी 7 सामने जिंकून विजेतेपदावर सर्वात मजबूत दावा केला आहे.

मुंबई : मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या गोलंदाजीने विश्वचषकाच्या सामन्यात श्रीलंकेचा 55 धावांत भारताने धुव्वा उडवला. यासह टीम इंडिया 302 धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरीचे तिकीट मिळवणारा पहिला संघ बनला आहे. मोहम्मद शमीने 5, तर सिराजने 3 बळी घेतले. तत्पूर्वी, शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शानदार खेळीमुळे भारताने श्रीलंकेविरुद्ध 357 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. भारताने विश्वचषक स्पर्धेतील 7 पैकी 7 सामने जिंकून विजेतेपदावर सर्वात मजबूत दावा केला आहे.

भारताच्या 357 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. जसप्रीत बुमराहने श्रीलंकेच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर पथुम निशांकाला बाद केले. यानंतर दिमुथ करुणारत्ने मोहम्मद सिराजचा बळी ठरला. दिमुथ करुणारत्नेही खाते उघडू शकला नाही. त्याचवेळी श्रीलंकेचा तिसरा खेळाडू बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या केवळ 2 धावांवर होती. यानंतरही जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतशी श्रीलंकन ​​संघाची स्थिती बिकट होत गेली.

भारतीय गोलंदाजांचा कहर सुरूच होता. श्रीलंकेचे 5 फलंदाज शून्यावर बाद झाले. तर श्रीलंकेच्या संघाला 8 फलंदाजांनंतरही दुहेरी आकडा पार करता आला नाही. मात्र, एकीकडे अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही श्रीलंकेचा मोठा पराभव टाळता आला नाही.

दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 50 षटकात 8 विकेट गमावत 357 धावा केल्या. भारताचा सलामीवीर शुभमन गिलने 92 चेंडूत 92 धावा केल्या. विराट कोहलीने 94 चेंडूत 88 धावांचे योगदान दिले. याशिवाय श्रेयस अय्यरने 56 चेंडूत ८२ धावा केल्या. श्रीलंकेसाठी दिलशान मधुसंका सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. दिलशान मधुशंकाने 5 भारतीय खेळाडूंना आपला बळी बनवले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com