IPL 2024
IPL 2024

IPL 2024 Play Offs : प्ले ऑफचा सामना पावसामुळं रद्द झाल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

आयपीएल २०२४ चे लीग सामने संपले आहेत. आयपीएलच्या ७० सामन्यांनंतर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पहिल्या स्थानावर आहे.
Published by :

आयपीएल २०२४ चे लीग सामने संपले आहेत. आयपीएलच्या ७० सामन्यांनंतर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पहिल्या स्थानावर आहे. केकेआरने १४ सामन्यांमध्ये ९ सामने जिंकून पहिल्या क्रमांकावर जागा पक्की केली आहे. तर दुसऱ्या नंबरवर सनरायजर्स हैदराबादचा संघ क्वालिफाय झाला आहे. हैदराबादने १४ पैकी ८ सामन्यांमध्ये विजय संपादन केलं आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. राजस्थाननेही १४ पैकी ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. रनरेटमध्ये हैदराबादच्या मागे असल्याने राजस्थान तिसऱ्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीने प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी सीएसकेचा पराभव केला होता. आरसीबीने सलग सहा सामने जिंकून प्ले ऑफमध्ये स्थान मिळवलं. आता प्ले ऑफचे सामने खेळवले जाणार आहेत. जाणून घेऊयात संपूर्ण शेड्युलबाबत सविस्तर माहिती.

प्ले ऑफच्या सामन्यात पावसाने खोडा घातल्यास काय होणार ?

पावसामुळे आयपीएल प्ले ऑफचा सामना रद्द झाल्यास कोणता संघ पुढे जाणार, असा प्रश्न चाहत्यांना नक्कीच पडला असेल. रिपोर्टनुसार, फायनलसाठी एकच राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. अशातच जर क्वालिफायर-१, एलिमिनेटर आणि क्वालिफायर-२ च्या सामन्यात पावसाने खोडा घातल्यास पंचांकडे अतिरिक्त १२० मिनिटे असणार आहेत. पंच कमीत कमी पाच षटकांचा सामना खेळवण्याचा प्रयत्न करतील. जर ५-५ षटकांचा सामनाही झाला नाही, तर पंच सुपर ओव्हरने सामन्याचा निर्णय घोषित करण्याचा प्रयत्न करतील. यादरम्यानही पाऊस थांबला नाही, तर गुणतालिकेच्या आधारावर निर्णय दिला जाईल. गुणतालिकेत ज्या संघाची स्थिती चांगली असेल, तो संघ पुढे जाईल.

आयपीएल फायनलसाठी रिझर्व्ह डे?

आयपीएल फायनलसाठी रिझर्व्ह डे आहे की नाही, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. २०२३ चा फायनलचा सामना राखीव दिवसातच खेळवला गेला होता. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामातही फायनलसाठी राखीव दिवस ठेवला असेल, अशी आशा आहे. बीसीसीआय याबाबत लवकरच अपडेट देणार आहे. पावसामुळे सामना पूर्ण झाला नाही, तर सामना राखीव दिवसात खेळवला जातो. अशा परिस्थितीत सामना जिथे थांबला होता, त्या षटकापासूनच सामना सुरु केला जातो. फायनलसाठी कमीत कमी ५ षटकांचा सामना होण्याची आवश्यकता असते. जर पाच षटकांचा सामना झाला नाही, तर पंच सुपर ओव्हरचा निर्णय घेतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com