Glenn Maxwell: मॅक्सवेलचा वादळी विजय; भारताला केले 5 विकेटने पराभूत

Glenn Maxwell: मॅक्सवेलचा वादळी विजय; भारताला केले 5 विकेटने पराभूत

IND VS AUS: ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच विकेटने पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 ने कमबॅक केलेय.
Published by :
Team Lokshahi

India VS Australia: ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच विकेटने पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 ने कमबॅक केलेय. गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताचा 5 गडी राखून पराभव केला. ग्लेन मॅक्सवेलने 48 चेंडूत 104 धावांचा पाऊस पाडला. मॅक्सवेलच्या वादळी शतकामुळे ऋतुराज गायकवाडचे शतक व्यर्थ ठरले.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 223 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 20 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर 225 धावा करत विजय नोंदवला. ग्लेन मॅक्सवेलच्या वादळामध्ये भारतीय गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. रवि बिश्नोई याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला धावगतीला आवर घालता आली नाही. मॅक्सवेलच्या शतकामुळेच ऑस्ट्रेलियाने अशक्यप्राय विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या 48 चेंडूत 102 धावांची गरज होती. मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वेडने चौकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली. यानंतर मॅक्सवेलने तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार मारला. मॅक्सवेलने पाचव्या चेंडूवर चौकार मारून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चौथे शतक पूर्ण केले. त्याने 47 चेंडूत शतक झळकावले. शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला दोन धावांची गरज होती आणि मॅक्सवेलने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने 48 चेंडूत 104 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी, मॅथ्यू वेड 16 चेंडूत 28 धावांवर नाबाद राहिला.

ग्लेन मॅक्सवेल आता रोहित शर्मासह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे. दोघांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावली आहेत. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत पुनरागमन केले आहे. मालिकेत भारत अजूनही 2-1 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील चौथा सामना रायपूरमध्ये 1 डिसेंबरला होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com