RCB च्या विजयानंतर कर्णधार स्मृती मंधानाची मोठी प्रतिक्रिया; म्हणाली,"ट्रॉफी जिंकणारी मी एकटीच..."
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये वुमन्स प्रीमियर लीगचा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात रंगला. या सामन्यात कर्णधार स्मृती मंधानाच्या आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा ८ विकेट्सनं दारुण पराभव करून या लीगच्या विजेत्यापदावर मोहोर उमटवली. दिल्ली कॅपिटल्सनं आरसीबीला ११४ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या आरसीबीनं चमकदार कामगिरी करत ११५ धावा करुन या क्रिकेट लीगमध्ये पहिल्यांदाच जेतेपद पटकावले आहे. तर पुरुष संघ आयपीएलमध्ये १६ वर्षांपासून जेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, त्यांच्या पदरी पराभवाची निराशाच पडली आहे. तर मंधानाच्या संघाने वुमन्स प्रीमियर लीगमध्ये दुसऱ्याच हंगामात डब्ल्यूपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. बंगलोरचं जेतेपद पटाकवण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर स्मृती मंधानाने मोठी प्रतिक्रिया दिलीय. 'ई साला कप नामदे' (या वर्षी चषक आमचा असेल) असं नाही, तर 'ई साला कप नामदू' (या वर्षी चषक आमचा असेल). मी ट्रॉफी जिंकणारी एकमेव व्यक्ती नाही. संघाने ट्रॉफी जिंकली आहे, असं मंधानाने म्हटलं आहे.
स्मृती मंधानाने जेतेपद जिंकल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, या क्षणाबद्दल सांगणं माझ्यासाठी कठीण आहे. मला या गोष्टीचा गर्व आहे, हे मी नक्कीच सांगेल. आमच्या बंगलोर संघानं चांगली कामगिरी केलीय. आम्ही दिल्लीत आलो दोनदा आमचा मोठा पराभव झाला. आम्हाला योग्यवेळी अचूक पावलं उचलण्याची गरज आहे, याबाबत आम्ही चर्चा केली. मागील वर्षी आम्ही खूप चांगला अनुभव घेतला. काय चूका झाल्या, काय बरोबर झालं, याबाबत चर्चा झाली. संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आंल की, हा तुमचा संघ आहे, तुमच्या पद्धतीने संघ मजबूत करा. त्यांचे मी आभार मानते. आरसीबीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. चाहत्यांनी केलेल्या सपोर्टबद्दल त्यांचेही आभार मानते. कन्नड माझी मातृभाषा नाही, पण चाहत्यांसाठी 'ई साला कप नामदे' म्हणणं महत्वपूर्ण होतं."
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीची सलामी फलंदाज शेफाली वर्ला आणि कर्णधार मेग लॅनिंगने चांगली सुरुवात केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागिदारी केली. त्यानंतर बंगलोरच्या संघापुढे दिल्लीची धावसंख्या रोखण्याचं मोठं आव्हान होतं. परंतु, सोफी मोलिनक्सने एकाच षटकात तीन विकेट घेत आरसीबीची वापसी केली.