Uddhav Thackeray: महायुतीच्या सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लागली आहेत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात, आपल्या सभेला मैदान पूर्ण भरलेले असते असं म्हणत उद्धव ठाकरेंने शिंदे आणि अजित पवार यांना टोला लगावला आहे. राज्यातील जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. भाजपवर नेते चोरण्याची वेळ आली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, देश गुजरातमधून चालवला जातोय, 2047 मध्ये देश सर्वात बलवान असेल, असं म्हणतात 2047 तुम्ही तरी बघणार आहे का? 2047 तुमच्या उरावर घाला, गरिबाला आज काय देणार सांगा. गद्दारांना पन्नास कोटी देता आणि गरिबांना काहीही नाही.
मोदींचे फोटो लावून जिंकल्याचा भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ज्यावेळी मोदी नाव कुणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो. शिवसेनाप्रमुख होते, म्हणून मोदी तुम्हाला दिसतायत, आम्हाला काय सांगताय मोदींचं कौतुक. आम्हाला आमचे कट्टर शिवसैनिक आणि जीवाला जीव देणारे कट्ट्रर मावळे पुरेसे आहेत. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या पेटीत टाकायला निघाले होते, तेव्हा हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर, मोदीच दिसले नसते, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर जोरदार घणाघात केला आहे.