मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप, शिंदे गट आणि मनसे चांगलेच आक्रमक झाले असून ठिकठिकाणी राहुल गांधींविरोधात आंदोलने करण्यात येत आहे. अशातच राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे.
माहितीनुसार, भारत जोडो यात्रेद्वारे राहुल गांधी इंदौरला पोहोचल्यावर त्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. जुनी इंदौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र मिळाले आहे. जुनी इंदौर पोलीस आणि गुन्हे शाखेने पत्र टाकलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी जुनी इंदूर पोलीस स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करत आहेत. 24 नोव्हेंबरच्या सुमारास राहुल गांधी इंदौरच्या खालसा स्टेडियममध्ये रात्र विश्रांती घेणार आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
राहुल गांधी देशात कन्याकुमारी ते काश्मीर अशी पायी 'भारत जोडो यात्रा' काढत आहेत. भारत जोडो यात्रा २० नोव्हेंबरला मध्य प्रदेशात दाखल होणार आहे. तर, आज राहुल गांधी बुलढाण्यात असणार आहेत. परंतु, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकारांवर एका भाषणात टीका केल्याने महाराष्ट्रभरात राजकीय नेते आक्रमक झाली असून जोरदार आंदोलने करत आहेत. तर, मनसेनीही या वादात उडी घेतली असून राहुल गांधींच्या आजच्या सभेत काळे झेंडे दाखवणार आहे.