केंद्रात भाजपचे सरकार तरी वीर सावरकरांना भारतरत्न का नाही? राऊतांचा सवाल
मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन भाजप, शिंदे गट आणि मनसे चांगलेच आक्रमक झाले असून ठिकठिकाणी राहुल गांधींविरोधात आंदोलने करण्यात येत आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
संजय राऊत म्हणाले, वीर सावरकारांना भारतरत्न द्यावा अशी आमची मागील 10 वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु, माझा नकली हिंदुत्ववाद्यांना प्रश्न आहे की, ते वीर सावरकरांना भारत रत्न देण्याची मागणी का उचलून धरत नाही. वीर सावरकर हे कधीच भाजप आणि आरएसएसचे श्रध्दास्थान नव्हते हे इतिहासही सांगतो. पण, आता राजकारणासाठी त्यांनी वीर सावरकारांचा विषय घेतलेला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. केंद्रात भाजपचे सरकार असतानाही वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही. त्यांचे सावरकर प्रेम नकली ढोंगी आहे का? याचा विचार करायला पाहिजे, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे. तसेच, हिंदुहदयसम्राट व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून वीर सावरकरांचा पुरस्कार केलेला आहे आणि तो कायम करत राहणार, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याची काही गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्येही दरार पडू शकते, असा इशाराच संजय राऊत यांनी राहुल गांधींना दिला आहे. आम्ही वीर सावरकरांना श्रध्दास्थान मानतो. आणि नेहमी मानत राहणार आहोत. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला नाही तर महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. इतिहास काळात काय घडले आणि नाही घडले हे चिवळत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. आणि राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला राऊतांनी राहुल गांधींना दिला आहे.