Weather Update | हवामान खात्याचा रत्नागिरी आणि रायगडला रेड अलर्ट
राज्यात परतीच्या पावसाची सुरवात झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. महत्वाचं म्हणजे रत्नागिरी आणि रायगडला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. यामुळे याठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे चिपळूणमध्ये गेली १७ तास मुसळधार पाऊस कोसळत असून पुन्हा एकदा महापुराची भीती असल्याने आधीच एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने याचा थेट आणि संपूर्ण परिणाम हा महाराष्ट्रावर होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चिपळूणमध्ये NDRF टीम दाखल
२२ जुलै २०२१ चिपळूणमध्ये महापूर आला त्यावेळी हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले खरे, परंतु पुणेमार्गे येताना सातारा कोयना येथे या टीमला अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे तब्बल १४ तास उशिरा चिपळूणमध्ये दाखल झाली. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर एनडीआरएफचे पथक आज चिपळूणमध्ये दाखल झाले. २५ जवानांसह आवश्यक ती यंत्रणा घेऊन हे पथक पुणेमार्गे चिपळूणमध्ये दाखल झाले आहे. चिपळूणमध्ये पुन्हा महापूर आल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी या पथकाची मोठी मदत होणार आहे.

