जलवाहिनीच्या कामकाजामुळे वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील पाणीपुरवठा मंगळवार, ८ एप्रिल रोजी सायंकाळी अडीच तासांसाठी खंडीत करण्यात येणार आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी गाळून किंवा उकळून पिण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
एच पश्चिम विभागातील वांद्रे केबिन, वांद्रे पूर्व येथील ६०० इंच व्यासाची तुलसी जलवाहिनी कालबाह्य झाली आहे. या कारणाने जुनी जलवाहिनी बंद करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार, ८ एप्रिल रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कारणामुळे एच पूर्व विभागातील बीकेसी परिसरामध्ये येत्या मंगळवारी पाणीपुरवठा खंडित करावा लागणार आहे. सायंकाळी ५ ते ७.३० या कालावधीतील पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
या जलवाहिनी विषयक कामकाज झाल्यानंतर एच पूर्व विभागाच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा होणे अपेक्षित आहे. संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. पाणीपुरवठा खंडित कालावधीत काटकसरीने पाणी वापर करावा. तसेच पुढील ४ ते ५ दिवस पाणी गाळून, उकळून प्यावे. महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.