Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट फोन करून पाठिंब्याची विनंती केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे पडसाद अजूनही सुरू असतानाच अचानक उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने महाराष्ट्रातील राजकारणात नवीनच चर्चांना सुरुवात झाली आहे. उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर भाजप–एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत एनडीएला बिनविरोध विजय हवा असल्याचे संकेत मिळत आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट फोन करून पाठिंब्याची विनंती केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. फडणवीस यांनी “आम्हाला तुमचाही पाठिंबा हवाय” असे स्पष्ट शब्दांत सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या फोन कॉल्सबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. विशेष म्हणजे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना असा फोन गेल्याचे कोणतेही वृत्त समोर आलेले नाही. त्यामुळे फडणवीसांनी विरोधी पक्षातील केवळ वरिष्ठ नेत्यांना ठाकरे आणि पवार यांना संपर्क केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, विरोधी आघाडीने माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार घोषित केले आहे. दिल्लीतील संसद भवनात राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत रेड्डी यांनी अर्ज दाखल केला. या वेळी शरद पवार म्हणाले, “ही लढाई संविधान आणि लोकशाही बळकटीकरणाची आहे. बी. सुदर्शन रेड्डी हे लोकशाही मूल्यांवर गाढ विश्वास असलेले उमेदवार आहेत.” यामुळे विरोधी पक्ष आघाडीचा पाठिंबा रेड्डींनाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फडणवीस हे सध्या एनडीएच्या उमेदवारासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त पाठिंबा मिळविण्याच्या मोहिमेत आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन करून केलेली विनंती ही त्याचाच एक भाग असल्याचे मानले जाते. दुसरीकडे, विरोधक मात्र एकजुटीचे प्रदर्शन करत असून, एनडीएचा उमेदवार बिनविरोध निवडून जाण्याची शक्यता क्षीण होत चालली आहे. या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.

भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठी राज्यपाल राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आल्याने, महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांना संपर्क साधणे ही नैसर्गिक बाब असल्याचे काहींचे मत आहे. मात्र, ठाकरे–पवारांनी आधीच इंडिया आघाडीच्या उमेदवाराला समर्थन दिल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याने फडणवीसांच्या या हालचालींना वेगळेच राजकीय अर्थ लावले जात आहेत. फडणवीसांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती सध्या फक्त राजकीय वर्तुळात चर्चेच्या रूपात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com