Operation Sindoor : 'ही तर भ्याडपणाची कृती'; पाकिस्तानी कलाकारांची मुक्ताफळं, संतप्त AICWA उचलणार कठोर पाऊल
जम्मू- काश्मीरच्या पहलगाम येथे 22एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये निष्पाप 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. याच दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर भारताने 7 मे रोजी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताना दोन कलाकारांनी भारताविरोधात विधान केले आहे. त्यामुळे सध्या वाद चांगलाच उफाळला आहे.
पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खानने भारताच्या कारवाईवर टीका व्यक्त केली आहे. "भ्याडपणाची कृती" असे टीकामध्ये म्हटले आहे. दोघांच्या या विधानांवर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने संतप्त प्रतिक्रिया देत त्यांचा तीव्र निषेध केला आहे. AICWA ने एक्सवर एक अधिकृत पोस्ट शेअर करत म्हटले की, "फवाद आणि माहिराच्या विधानांनी केवळ भारताचा नाही, तर देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांचा आणि दहशतवादाचे बळी ठरलेल्या निष्पाप नागरिकांचा देखील अपमान केला आहे." असोसिएशनने दोघांच्या भारतात काम करण्यावर कायमची बंदी घालण्याची मागणी केली आहे.
AICWA पुढे म्हणते, "हे दुर्दैवी आहे की काही भारतीय कंपन्या अजूनही अशा कलाकारांना काम आणि व्यासपीठ देत आहेत. अनेक भारतीय गायक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये पाकिस्तानी कलाकारांसोबत स्टेज शेअर करताना दिसतात, जे देशाच्या भावना दुखावणारे आहे." पुलवामा हल्ल्यानंतरही फवाद खानला चित्रपटात घेणाऱ्या निर्मात्यांवरही AICWA ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "हा आपल्या देशाच्या सुरक्षेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आणि शहीदांच्या बलिदानाचा अपमान आहे," असे असोसिएशनने म्हटले.
AICWA ने भारतीय कलाकार, निर्माते आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीला आवाहन केले आहे की, "पाकिस्तानी कलाकारांशी कोणतेही व्यावसायिक संबंध न ठेवता राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशाचा अपमान सहन केला जाणार नाही." AICWA ने स्पष्ट केले आहे की, “राष्ट्र प्रथम” हीच संघटनेची भूमिका असून, अशा कलाकारांना भारतात काम करण्याचा कोणताही अधिकार नसावा.