Pahalgam Terror Attack : पाकिस्तान सीमेलगत गावातील शेतकऱ्यांना BSFचे आदेश, 48 तासांत कापणी न केल्यास...
पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतात सरकार अॅक्शन मोडवर आल्याच पाहायला मिळत आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलं आहे. त्याचसोबत आता पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबमधील अमृतसर, फिरोजपूर, गुरदासपूर, पठाणकोट हे जिल्हे पाकिस्तानच्या सीमेलगत आहेत. त्यामुळे त्याठिकाणी BSF जवानांनी सुरक्षा तैनात ठेवली आहे. त्याचसोबत गावांमध्ये कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास, तात्काळ पोलीस आणि BSF जवानांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंजाबमधील पठाणकोट ते फाजिल्कापर्यंत 553 किलोमीटर लांबीच्या सीमेवर सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. त्याचसोबत फिरोजपूरमधील कालू वाला हे गाव सतलुज नदीने तीन बाजूंनी वेढलेले आहे. याच्या एका बाजूला पाकिस्तान आहे. त्यामुळे BSF ने सीमेवरील शेतकऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. कुंपणीला लागून पंजाबमध्ये गव्हाची शेती केली जाते शून्य रेषेवर फक्त खांब त्यामुळे शून्य रेषेच्या आधी पंजाबमधील या गावांमध्ये शेतकऱ्यांना विशेष परवानगी घेऊन शेती करण्यास सांगण्यात आले आहे.
BSF ने शेतकऱ्यांना 48 तासांत गव्हाच्या शेतीची कापणी करून शेत खाली करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पीक पेरणी आणि कापणीच्या वेळी BSF जवान त्यांच्यासोबत तैनात असणार आहेत. या सुचना त्यांना गुरुद्वारातून देण्यात आल्या आहेत. तसेच जर 48 तासांत शेतकऱ्यांनी आपलं काम केलं नाही तर गेट पूर्णपणे बंद केले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी 48 तासांच्या आत आपले पीक कापून शेत खाली करणे आवश्यक असणार आहे. तसेच बॉर्डरवर कोणतीही हालचाल दिसल्यास, थेट गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.