Pakistan On Indus Treaty : "130 अणुबॉम्ब भारतासाठीच" सिंधू करार स्थगितीनंतर पाकचा जळफळाट, भारताला पोकळ धमक्या सुरु
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तान अत्यंत नाराज आहे. दररोज त्यांचे नेते काही ना काही विधाने करत आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी रक्ताचे पाट वाहतील अशी धमकी दिली होती. ज्यावरून असे दिसून येते की, पाकिस्तान भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईला घाबरत आहे.
आता पाकिस्तानी रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली आहे. तसेच " तुम्ही आमचे पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू. शाहीन, गझनवी आणि 130 अणुबॉम्ब भारतासाठीच ठेवली आहेत. जर भारताने कोणतेही धाडसी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला तर भारताला त्याची किंमत मोजावी लागेल",असं देखील ते म्हणाले आहेत. रावळपिंडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, जर भारताने पाकिस्तानचे पाणी रोखले तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांची भारताला दमकी
"सिंधूवर हल्ला केला, त्यामुळे मला सिंधू नदीच्या काठावर उभे राहून भारताला सांगायचे आहे की सिंधू आमची आहे आणि ती आमचीच राहील. एकतर आमचे पाणी या नदीतून वाहेल किंवा त्यांचे रक्त त्यातून वाहेल. भारताची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त असू शकते, पण पाकिस्तानचे लोक धाडसी आहेत. आम्ही सीमेवर आणि पाकिस्तानच्या आतही लढू. आमचा आवाज भारताला योग्य उत्तर देईल."
भारताची सिंधू जल कराराला स्थगिती
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर निर्यण घेतले. यामध्ये सिंधू पाणी कराराला स्थगिती हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. 23 एप्रिल रोजी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्रा यांनी स्पष्ट केले. त्यानुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आज पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित केला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये वाहणारी सिंधू नदी परिचित आहे. मात्र पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानचा थयथयाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अनेक नेत्यांकडून भारताला पोकळ धमक्या देण्यात येत आहेत.