India Pakistan
PAKISTAN CLAIMS PEACE SIGNAL AFTER VIRAL PHOTO, INDIA REJECTS ANY POLICY SHIFT

India Pakistan: कधी धमक्या, कधी मैत्री! भारताशी मैत्रीसाठी पाकिस्तान उतावीळ? सोशल मीडियावर व्हायरल फोटोमुळे राजकीय चर्चांना उधाण

Diplomacy: बांगलादेशातील एका औपचारिक हस्तांदोलनाच्या फोटोवरून पाकिस्तानने भारताशी मैत्रीचे दावे केले.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत–पाकिस्तान संबंध इतिहासातील सर्वात तणावपूर्ण टप्प्यावर पोहोचले आहेत. भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत कोणताही व्यापार, संवाद किंवा सहकार्य नाकारले आहे. मात्र, अशा स्थितीतही पाकिस्तानकडून भारताशी मैत्रीचे सूर पुन्हा आळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. बांगलादेशमध्ये घडलेल्या एका औपचारिक हस्तांदोलनाच्या फोटोवरून पाकिस्तानने मोठे दावे करायला सुरुवात केली आहे.

बांगलादेशात पार पडलेल्या एका शोकसमारंभादरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांच्यात काही क्षणांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये हस्तांदोलन झाले. याच घटनेचा आधार घेत पाकिस्तानमध्ये “भारत-पाकिस्तान संबंध नव्याने मार्गावर येण्याची शक्यता” असल्याचे दावे केले जाऊ लागले. मात्र भारताने या चर्चांवर तात्काळ स्पष्टीकरण देत पाकिस्तानचे कथित दावे फेटाळून लावले आहेत.

नेमकी घटना काय?

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या अंत्यसंस्कारासाठी ढाक्यात उपस्थित होते. याच कार्यक्रमासाठी पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक हेही बांगलादेशात आले होते. शोक पुस्तिकेत संदेश नोंदवण्याच्या वेळी दोघांची औपचारिक भेट झाली आणि शिष्टाचार म्हणून हस्तांदोलन झाले.

या छोट्या भेटीचे फोटो आणि संदर्भ पुढे करत पाकिस्तानच्या नॅशनल असेंबली सचिवालयाने प्रतिक्रिया दिली. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेली ही पहिली उच्चस्तरीय भेट असल्याचा दावा करत, पाकिस्तानने संवाद आणि सहकार्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे संकेत देण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानचा दावा, भारताची ठाम भूमिका

पाकिस्तानकडून या भेटीला “राजनैतिक संकेत” म्हणून मांडले जात असताना, भारताने मात्र कोणतीही संभ्रमाची स्थिती न ठेवता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत सरकारने सांगितले की, ही भेट पूर्णतः शिष्टाचाराचा भाग होती. शोकाकुल वातावरणात उपस्थित सर्व प्रतिनिधींनी आंतरराष्ट्रीय संकेतांचे पालन केले, इतकेच. भारताने पुन्हा एकदा ठामपणे अधोरेखित केले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या पाकिस्तानविषयक भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. दहशतवाद आणि चर्चा हे एकत्र चालू शकत नाहीत, हा भारताचा स्पष्ट संदेश कायम आहे.

हस्तांदोलनातून मैत्री नाही!

एका औपचारिक भेटीचा आधार घेत पाकिस्तानने भारताशी संबंध सुधारण्याची स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली असली, तरी भारताने वास्तवाची जाणीव करून देत त्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. बांगलादेशातील शोकसमारंभात घडलेली ही घटना केवळ आंतरराष्ट्रीय शिष्टाचारापुरती मर्यादित असून, भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये कोणताही नवा अध्याय सुरू झाल्याचे संकेत त्यातून मिळत नाहीत, हे भारताने स्पष्ट केले आहे. आता या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थिती कायम राहणार की भविष्यात काही बदल होणार, याकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष लागून राहिले आहे. मात्र सध्यातरी, पाकिस्तानच्या दाव्यांपेक्षा भारताची भूमिका अधिक ठाम आणि स्पष्ट दिसून येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com