Pahalgam Attack: इम्तियाज जलील यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत व्यक्त केला संताप, ठोस कारवाईची मागणी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप भारतीयांचा बळी गेल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात एमआयएम पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व एमआयएमचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले.
या आंदोलनात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला, तसेच पाकिस्तानचा झेंडा आणि त्याचे पोस्टर्स जाळून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. इम्तियाज जलील यांनी स्पष्ट शब्दांत केंद्र सरकारवर टीका करत, या हल्ल्याला सुरक्षा यंत्रणांचे अपयश असल्याचे म्हटले.
इम्तियाज जलील यांचा सरकारवर घणाघात
“काश्मीरमध्ये सुरक्षा दल तैनात असूनही अशा घटना घडत असतील, तर याला जबाबदार कोण?” असा थेट सवाल करत जलील यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी सांगितले की, “370 कलम हटवल्यानंतर सरकार स्वतःची पाठ थोपटत होते. पण प्रत्यक्षात, दहशतवादाच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. उलटपक्षी, अशा घटनांमुळे देशाची सुरक्षितता आणि खंबीर धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.”
"फक्त मिटिंग नाही, ठोस कारवाई करा"
जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करत म्हटले, “फक्त सर्वपक्षीय बैठकांमध्ये भाषणं देऊन काही होणार नाही. लोकांनी आधीही पुलवामा आणि पुरीप्रमाणे अशा घटनांनंतर तुमच्या कठोर भाषणांना टाळ्या दिल्या. पण जर त्या वेळी खरंच ठोस पावले उचलली गेली असती, तर आज पहलगामसारखी घटना झाली नसती.”
“कठोर कारवाईची मागणी”
पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा जाहीर निषेध करत, जलील म्हणाले, “जाती-धर्माच्या भिंती उभ्या करण्याचा पाकिस्तानचा डाव अपयशी ठरेल. संपूर्ण देश या घटनेविरोधात एकवटला आहे आणि आम्ही सर्व एक आहोत. सरकारने आता कठोर कारवाई करावी, आणि संपूर्ण जगाला दाखवून द्यावे की भारताच्या सुरक्षेला गालबोट लावणाऱ्यांचे काय परिणाम होतात. ”छत्रपती संभाजीनगरात झालेल्या या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्रात या हल्ल्याविरोधात संतप्त भावना उफाळून आल्या असून, आता जनतेकडून केंद्र सरकारकडून ठोस आणि निर्णायक कृतीची मागणी केली जात आहे.