India - China
India - China

India - China : भारताचा मोठा निर्णय; चिनी नागरिकांना पुन्हा व्हिसा देण्यास सुरुवात

पाच वर्षांनंतर भारत सरकार चिनी नागरिकांसाठी पर्यटन व्हिसा परत सुरू करत आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(India - China) पाच वर्षांनंतर भारत सरकार चिनी नागरिकांसाठी पर्यटन व्हिसा परत सुरू करत आहे. भारताच्या बीजिंगमधील दूतावासाने याबाबत घोषणा केली असून 24 जुलैपासून ही प्रक्रिया सुरू होईल.2020 मध्ये कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर भारताने सर्व प्रकारचे पर्यटन व्हिसा थांबवले होते. त्यानंतर आता प्रथमच चिनी पर्यटकांसाठी भारताचे दरवाजे खुले होत आहेत. दूतावासाच्या निवेदनानुसार, चिनी नागरिकांनी प्रथम ऑनलाईन अर्ज भरावा, त्यानंतर वेळ ठरवून बीजिंग, शांघाय किंवा ग्वांगझू येथील भारतीय व्हिसा केंद्रांमध्ये स्वतः उपस्थित राहून आपला पासपोर्ट आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, बीजिंगमधील केंद्रात पासपोर्ट मागे घेण्याची विनंती करताना त्यासोबत एक लेखी पत्र अनिवार्य आहे. गेल्या काही वर्षांत भारत-चीन प्रवासावर अनेक निर्बंध आले होते. सुरुवातीला कोरोनामुळे आणि नंतर गलवान खोऱ्यातील सैन्य संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. काही काळानंतर चीनने भारतीय विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना परत येण्याची परवानगी दिली, परंतु सामान्य प्रवासावर बंधने कायम होती.

गलवान संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये विश्वासाचा तुटलेला धागा परत जुळवण्यासाठी राजनैतिक व लष्करी पातळीवर संवाद सुरू करण्यात आले. त्यातून एलएसीवरील काही तणावपूर्ण भागांमधून सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाला.2024 च्या अखेरीस डेपसांग आणि डेमचोक या उर्वरित दोन संघर्ष भागांवरूनही दोन्ही देशांनी तडजोड करत सैन्य माघारी घेण्याचे ठरवले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कझान येथे भेट झाली, ज्यामध्ये संबंध सुधारण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

या वर्षात भारत-चीन संबंध सुधारण्याच्या दिशेने पुढे जाताना दोन्ही देशांनी थेट विमानसेवा पुन्हा सुरू करणे, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे आणि लोकांमधील परस्पर संपर्क वाढवण्यासाठी विविध योजना आखण्यावर भर दिला आहे. ही यात्रा 2020 नंतर बंद झाली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com