विधानसभेत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भावुक, म्हणाले, "तिला मी काय उत्तर देऊ ?"
काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. या सगळ्यामुळे संपूर्ण जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कठोर शिक्षा होईल असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. दरम्यान या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. यावेळी ओमर अब्दुल्ला यांनी भाषण केलं. त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
केवळ हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप 26 नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदन व्यक्त करण्यासाठी आज आपण इथं आलोय, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले. तसेच "माफी मागायला माझ्याकडे शब्द नाहीत. काय बोलू त्यांना, त्या लहान मुलांना, ज्यांनी आपल्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. जिचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं त्या नेव्ही ऑफिसरच्या विधवा पत्नीला काय बोलू", असे भावनिक उद्गार ओमर अब्दुल्लांनी सभागृहात काढले.