Operation Sindoor : पाकिस्तानवरील हल्ल्याबद्दल Omar Abdullah यांची प्रतिक्रिया, म्हणाले, "आम्ही विसरलो नाही..."
भारताने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राइक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. 7 मे रोजी केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये भारताने पाकिस्तानचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. सरकारच्या या कृतीचे आणि सैन्याच्या धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. देशातील तसेच राज्यातील अनेकांनी या एअर स्ट्राइकचे कौतुक केले आहे. अशातच आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी एएनआयला मुलाखत दिली. तेव्हा ते म्हणाले की, "सुरुवात पहलगामपासून झाली आहे. या ठिकाणी आपले निष्पाप जीव मारले गेले हे आम्ही विसरलो नाही. आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ असे सांगितले होते. उत्तर देण्याची हीच योग्य पद्धत होती. भारतीय लष्कराने पाकिस्तानातील कोणताही नागरिक किंवा सैन्याला लक्ष्य केले नाही. दहशतवाद्यांनी लक्ष्य करणे हेच उद्देश होते. सुरुवात त्यांच्याकडून झालीय, आमच्याकडून नाही. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला नसता तर अशी वेळ आलीच नसती".
पुढे ते म्हणाले की, "आम्ही येथे व्यवस्थित राहत होतो. पहलगामविरोधात आम्हाला उत्तर द्यायचंच होतं. आम्हाला युद्ध नकोय. आम्ही आधीच्या युद्धात पाहिलंय की युद्धामुळे जम्मू काश्मीरलाच सर्वाधिक नुकसान पोहोचतं. पण शेजारी राष्ट्रांनी त्यांच्या बंदुका शांत कराव्यात, जेणेकरून येथून बंदुका चालणार नाहीत". पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. पाकिस्तानला धडा शिकवण्यात यावा अशी मागणीदेखील केली जात होती.