Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर...
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 28 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले.
लष्करी गणवेशात असल्याने पर्यटकांना दहशतवादी असल्याचा अंदाज आला नाही. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
यातच पार्श्वभूमीवर या हल्ल्यावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे की, आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला नकार देतो. पहलगाममधील दहशवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणताही संबंध नाही. हा हल्ला भारतातील केंद्र सरकारच्या विरोधात होता. मणिपूर, नागालँडपासून काश्मीरपर्यंत अशांतता असून या हल्ल्याला देशातील परिस्थितीच जबाबदार आहे. भारतात, नागालँडपासून मणिपूर आणि काश्मीरपर्यंत, लोक सरकारच्या विरोधात आहेत.
भारतातील केंद्र सरकारला नागालँड, मणिपूर, काश्मीर आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये निषेधांचा सामना करावा लागतोय. सरकार अनेकांचं शोषण करत असल्याने याला देशातील परिस्थिती जबाबदार आहे. आम्ही कोणत्याही स्वरुपात दहशतवादाचं समर्थन करत नाही. असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले.