Operation Sindoor : "हल्ला होईपर्यंत पाक सैन्य झोपलं होतं का?" भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी नागरिकाची प्रतिक्रिया व्हायरल
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं. महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या पतींना गोळ्या झाडल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव ‘मिशन सिंदूर’ ठेवलं गेलं. भारतीय सैन्य दलाने या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे. दहशतवाद्यांनी यापुढे कोणत्याही महिलेचं सिंदूर पुसण्याची हिंमत केली तर ते युद्धासारखं मानलं जाईल हा स्पष्ट संदेश या प्रत्युत्तरातून दिला आहे.
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं सीमा रेषेवरील राजौरी येथे स्थानिकांच्या घरांवर फायरींग केली आहे. यात काही नागरिक मारले गेल्याचं समोर आलं आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये तीन प्रमुख दहशतवादी ठार झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. बहावलपूर येथील हल्ल्यात मसूद अझहर, मुरिदके येथील हल्ल्यात हाफिज सईद आणि सियालकोटमध्ये सलाहुद्दीनला ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. त्याचसोबत भारताच्या वायुदलाच्या जवानांनी पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळ भिंबर, कोटली, सरजाल सियालकोट, मेहमूना जोया, मरकज् तैबा मुरीदके, मरकज् सुभान अल्लाह बहावलपूरसह 9 ठिकाणी दहशतवादी तळं उद्धवस्त करण्यात यश मिळवलं आहे.
या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधून विविध प्रकारचे व्हिडिओ समोर येत आहेत. या व्हिडिओमध्ये, एका पाकिस्तानी व्यक्तीने 'हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानी सैन्य कुठे होते? असा सवाल केला आहे. त्याने व्हिडिओमध्ये सांगितले की, "मसूद अझहरच्या मदरशावर 4 क्षेपणास्त्रे टाकण्यात आली होती आणि आता मदरसा जमीनदोस्त करण्यात आला आहे. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही आमच्या पाकिस्तानी सैन्याच्या सोबत आहोत. पण माझा प्रश्न असा आहे की, आमची पाकिस्तानी सेना कुठे गेली होती?" कुठे झोपली होती".