India-Pakistan War : भारत-पाकिस्तान तणावात अमेरिकाची एन्ट्री; परराष्ट्र मंत्र्यांचा पाकिस्तानला फोन
पहलगाममधील हल्ल्यानंतर आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. दोन्ही देशांमध्ये मागचे गेले दोन दिवस जोरदार हल्ले होताना दिसत आहेत. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानच्या 9 दहशदवादी ठिकाणी हल्ला केला होता.
यानंतर 8 मे आणि आणि काल 9 मे रोजी रात्रीच्या सुमारास दोन्ही देशात हल्ले होताना पाहायला मिळाले. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी शुक्रवारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फोन करून तणाव कमी करण्याचे आवाहन केले.
"भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी" दोन्ही देशांमधील "रचनात्मक" चर्चा सुरू करण्यासाठी अमेरिकेला मदत करण्याची ऑफर दिली, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू करण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थीची तयारी दाखवली आहे.