India Pakistan War Updates : नागरी वस्तीवर पाकड्यांचा हल्ला, भारताने पाकचे मिसाईल हवेतच उडवले; एअरबेसही उद्ध्वस्त
पहलगाम हल्ल्यावर प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आलं. पाकिस्तानकडून देखील गुरुवारी 8 मे 2025 रात्री 9 वाजल्यापासून भारतावर हल्ले केले जात होते. या हल्ल्यात भारतीय सैन्य पाकिस्तानला रोखठोक प्रतिहल्ला करताना पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर काल शुक्रवारी 9 मे 2025 रोजी पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतातील 26 शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले. पाकिस्तानचे हे हल्ले भारतीय संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले. याचपार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली यात भारतीय लष्करांनी काल झालेल्या हल्ल्याबाबत माहिती दिली.
विक्रम मिस्री म्हणाले, "गेल्या 2-3 दिवसांत पाकिस्तानच्या कारवाया प्रक्षोभक मानल्या जात आहेत, ज्याला उत्तर म्हणून भारत जबाबदारीने उत्तर देत आहे. गेल्या दोन-तीन ब्रीफिंगमध्ये आम्ही सांगितले आहे की भारतातील त्यांच्या कारवायांबद्दल पाकिस्तानकडून चिथावणीखोर कारवाया केल्या जात आहेत, भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे."
कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की,"पाकिस्तानने भारतावर मध्यरात्री मिसाईल हल्ले केले असून पाकिस्तानने 26 ठिकाणी हल्ला केला. भारताने पाकिस्तानच्या सीयालकोट एअरबेसवर हल्ला केला. पाकिस्तान भारतीय संरक्षण प्रतिष्ठानांना, हॉस्पिटल आणि शाळांना टार्गेट करत आहे. पाकिस्तानचा वारंवार नागरी वस्त्यांवर हल्ला करत आहे. पंजाबच्या एअरबेसवर पाकिस्तानने हल्ला केला, ज्याला भारताने प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. उधमपूर, भुज, भटिंडा, पठाणकोटसह 5 ठिकाणी उपकरणांचे नुकसान झाले. श्रीनगर, अवंतीपूर येथे वैद्यकीय संकुल आणि शाळेला लक्ष्य करण्यात आले." असं कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या आहेत.