Lata Mangeshkar passes away | लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
आपल्या दैवी आवाजाने तब्बल चार पिढ्यांच्या मनावर सुरेल राज्य करणाऱ्या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचं आज सकाळी निधन झालं. त्यामुळे राज्य सरकारने (maharashtra government) दुखवटा जाहीर केला आहे. ह्याच कारणाने उद्या सोमवार 7 फेब्रुवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही राजकीय दुखवटा जाहीर केल्याने दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंत्रालयावरील (mantralaya) तिरंगा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. संसदेसह देशभरातील विधानसभा, मंत्रालये, सचिवालये आणि सरकारी कार्यालयांवरील तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. तसेच लतादीदींच्या पार्थिवावर सायंकाळी साडे सहाच्या सुमारास दादरमधील शिवाजी पार्कात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत पोहोचणार आहेत.
लता मंगेशकर यांचं आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी दीर्घ आजाराने निधन झालं. त्या तब्बल 28 दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या. काल त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्या उपचाराला प्रतिसादही देत होत्या अशी माहिती डॉक्टरांनी दिली होती. मात्र, आज सकाळी त्यांनी परलोकीचा प्रवास सुरू केला. त्यांच्या निधनानंतर केंद्र आणि राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे.
राज्य सरकारने यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 'आज रविवार 6 फेब्रुवारी रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881( सन 1981चाअधिनियम 26 ) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.'