Mango : आंबा खाण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या...

Mango : आंबा खाण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या...

आंबा खाण्याची योग्य पद्धत: आरोग्यासाठी महत्वाचे टिप्स
Published by :
Team Lokshahi
Published on

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की सगळ्यांना वेड लागते ते म्हणजे आंबे खाण्याचे. निसर्गाने आपल्याला उन्हाळ्यामध्ये रसाळ आंबे दिले आहेत. फळांचा राजा म्हटल्या जाणाऱ्या आंब्याच्या अनेक जाती प्रजाती असतात, पण कोकणातला हापूस आंबा चवीला सर्वोत्कृष्ट असतो. आजकाल हिवाळ्याच्या शेवटीच बाजारात आंबे दिसू लागतात. परंतु जोपर्यंत उन्हाळा नीट सुरू होत नाही तोपर्यंत आंबा चवदार लागत नाही. त्यामुळे घाईघाईने आंबा विकत घेण्याचा मोह टाळावा. गवताच्या अढीत ठेवून पिकवलेला आंबा चवीला छान लागतो. रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेला आंबा खाणे आरोग्याला चांगले नसते.

आंबा पिकून तयार झाल्याची खूण म्हणजे त्याला येणारा सुगंध आहे. त्यामुळे आंबा विकत घेताना देठापाशी वास घेऊन पाहावा आणि छान पिकलेला आंबा खाण्यासाठी वापरावा. आंबा खाण्यापूर्वी तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. तसेच आंबा तासभर पाण्यामध्ये बुडवून ठेवावा. कारण आंबा गरम असतो. त्याच्यामधला गरमपणा कमी होण्यासाठी आंबा पाण्यात भिजवावा. तसेच आंबा शक्यतो दिवसा खावा. सूर्यास्तानंतर आंबा खालल्यास आरोग्यास चांगले नसते.

लहान मुलांनी किंवा तरुणांनी कधीकधी फोडी करुन आंबा खाल्ला तरी चालतो. परंतू त्याच आंब्याचा रस काढून त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून त्यात 2 चिमूट चातुर्जात गणातील द्रव्यांचं मिश्रण मिक्स करुन खाणं चांगले असते. चातुर्जात म्हणजे दालचिनी, वेलची, तमालपत्र आणि नागकेशर. ही चारही द्रव्यं वजनाने समान एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक दळून घ्या. आता तुमचे चातुर्जात तयार आहे. हवा बंद डब्यामधे हे मिश्रण भरून ठेवा. साधारण वाटीभर रसामध्ये दोन चमचे साजूक तूप आणि २ चिमूट चातुर्जात चूर्ण मिक्स केल्याने आंबा पचण्यास मदत करते.

उन्हाळ्यामध्ये दमलेला शरीराला आणि मनाला पुन्हा स्फूर्ती मिळण्यास मदत मिळते. आंबा चांगल्या प्रतीचा असला आणि तो या पद्धतीनी सेवन केला, म्हणजेच नीट पचला जातो. त्यामुळे शरीराची शक्ती वाढते, पचन सुधारण्यास मदत मिळते, भूक सुधारते, तोंडाला चव येते, मलप्रवृत्ती साफ होण्यास मदत मिळते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com