Sadhguru
SadhguruTeam Lokshahi

सदगुरू वाणी : पौर्णिमा अन् अमावस्यात फरक काय?

एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरू हे भारतातील पहिल्या ५० अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे २०१७ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लोकशाहीच्या वाचकांसाठी सदगुरुंची ही प्रेरणादायी मालिका...
Published by  :
Team Lokshahi

प्रश्न: पारंपारिकपणे, भारतीय आध्यात्मात चंद्राच्या कलांना खूप महत्त्व आहे. पौर्णिमा आणि अमावस्या यांचे नेमके महत्त्व काय आहे?

सद्गुरू: पौर्णिमेची एक रात्र आणि एखादी दुसरी रात्र यात खूप फरक असतो. जे लोक थोडे वेडे आहेत त्यांना हा फरक चांगलाच कळतो! हे का घडते ते पाहूया.

हे माईकचा आवाज वाढवण्यासारखे आहे. बोलणे तसेच चालू राहते, पण अचानक आवाज जरा जोरात आणि स्पष्ट होतो. त्याचप्रमाणे, पूर्वी थोडे वेडेपणा असेल, जर तुम्ही त्याला थोडी जास्त ऊर्जा दिली किंवा उर्जेचा प्रवाह वाढवला, तेव्हा सगळ्या गोष्टी मोठ्या होऊन दिसतात. पौर्णिमेच्या दिवशी ऊर्जा थोडी जास्त असते. फक्त वेडेपणाच मोठा होऊन दिसतो असे नाही. जर तुम्ही शांतताप्रिय असाल तर तुम्ही अधिक शांत व्हाल. जर तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही अधिक आनंदी व्हाल. तुमचा जो काही गुण आहे त्याला बढावा मिळतो. लोकांना फक्त वेडेपणा लक्षात आला कारण बहुतेक लोक त्या अवस्थेत आहेत! पण तुम्ही खूप प्रेमळ व्यक्ती असाल, तर तुमचे प्रेम पौर्णिमेला ओसंडून वाहते.

ऊर्जेमध्ये कशामुळे वाढ होते? एक पैलू असा आहे की, त्यात एक विशिष्ट सौंदर्य आहे. तुम्ही जे काही पाहता, ते सुंदर असेल तर त्या वस्तूबद्दल तुमची ग्रहणशीलता अचानक वाढते. एखादी गोष्ट ज्याला तुम्ही कुरूप मानता, ज्या क्षणी तुम्ही त्याकडे पाहता, त्याक्षणी तुमची ग्रहणशीलता कमी होते. पौर्णिमेच्या चंद्राला एक विशिष्ट सौंदर्य असते ज्यामुळे तुमची ग्रहणशीलता निश्चितच सुधारते.

दुसरा पैलू असा आहे की, पृथ्वी तिच्या उपग्रहाच्या दृष्टीने एका विशिष्ट ठिकाणी आहे, ज्यामुळे कंपने अगदी थेट आणि जोरदार होतात. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे या दिवशी भरती-ओहोटी वाढते. पाणी ऊतू जाते आणि वर "उडी मारण्याचा" प्रयत्न करते. त्याचप्रमाणे, तुमचे रक्त देखील "उडी" मारण्याचा प्रयत्न करते. जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये रक्ताभिसरण वाढते, तेव्हा तुमचा जो काही गुण आहे तो वाढतो.

सूक्ष्म का जबरदस्त ऊर्जा

आता अमावस्येच्या संदर्भात, पौर्णिमा आणि अमावस्येच्या ध्यानाच्या गुणवत्तेत खूप फरक आहे. ध्यान करणाऱ्या व्यक्तीसाठी पौर्णिमा चांगली असते. पण अमावस्या काही विधी आणि प्रक्रिया करण्यासाठी चांगला दिवस आहे. अमावस्येच्या रात्री तुमची ऊर्जा दगाबाज असू शकते. मदमस्त हत्तीप्रमाणे तुमची ऊर्जा मुक्त वाहते. म्हणूनच अमावस्येच्या रात्रीचा उपयोग तांत्रिक लोक करतात. त्यामुळे ऊर्जेला चालना मिळते. पौर्णिमेच्या रात्रींचे गुण थोडे नियंत्रित असतात, जे अधिक सूक्ष्म, आनंददायी आणि सुंदर असतात - प्रेमासारखे. अमावस्या ही मूलभूत ऊर्जा आहे. जर तुम्हाला दोघांची तुलना करायची असेल, तर तुम्ही म्हणू शकता की अमावस्या अधिक लैंगिक-केंद्रित आहे आणि पौर्णिमा अधिक प्रेम-केंद्रित आहे. अमावस्या स्थूल स्वरूपाची असते आणि ती अधिक शक्तिशाली असते. पौर्णिमेचा स्वभाव सूक्ष्म असतो. तुम्हाला ती शक्ती जाणवत नाही, इतकी ती सूक्ष्म असते. कुंडलिनी देखील अशीच वागते: पौर्णिमेला ती अतिशय हळूवारपणे हालचाल करते आणि अमावस्येच्या दिवशी तिची खूप जोरदार हालचाल होते. अमावस्या थोडी अधिक हिंसक असते.

पौर्णिमा एक प्रचंड उपस्थिती आहे. चंद्राची उपस्थिती इतकी स्पष्ट असते की जिकडे पाहावे तिकडे सर्व काही पारदर्शक होते. कंपन आणि प्रकाश यांच्या गुणवत्तेनुसार जिथे प्रत्येक गोष्टीला नवीन प्रकारची आभा प्राप्त होते. पौर्णिमेची कंपने आणि अनुभूती चंद्राच्या इतर कलांपेक्षा खूप वेगळी असते. तुमच्यातील इडा आणि पिंगळा देखील वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. प्राण किंवा मूलभूत उर्जा वेगळ्या प्रकारे वाहते. तुमची संपूर्ण ऊर्जा वेगळ्या पद्धतीने वाहत असते कारण कंपने बदलतात.

असे नाही की तुम्ही रोज पौर्णिमेच्या स्थितीत राहू शकत नाही. तुम्ही राहू शकता. जर तुमचे सूर्य आणि चंद्र - पिंगळा आणि इडा - वर काही प्रमाणात प्रभुत्व असेल तर - पौर्णिमेचे सौंदर्य कडक सूर्यप्रकाशातही तुमच्यामध्ये टिकून राहील. तुमच्याकडे विशिष्ट प्रभुत्व आणि नियंत्रण असल्यास, तुम्ही दररोज पौर्णिमा निवडू शकता. किंवा तुम्ही रोज अमावस्या निवडू शकता. किंवा तुम्ही अजिबात निवडत नाही: निसर्गात जे काही घडत आहे, तुम्ही जीवनाच्या सर्व टप्प्यांचा आनंद घेत असता.

उपस्थिती की अनुपस्थिती

पौर्णिमा ही प्रचंड उपस्थिती असते, तर अमावस्या ही अनुपस्थिती असते. तार्किक मन नेहमी विचार करते की उपस्थिती शक्तिशाली आहे आणि अनुपस्थितीचा अर्थ काहीच नाही. पण तसे नाही. प्रकाशात जशी शक्ती असते, तशीच प्रकाशाची अनुपस्थिती – किंवा अंधाराची – स्वतःची एक शक्ती असते. खरं तर, ते प्रकाशापेक्षा जास्त शक्तिशाली असते, नाही का? दिवसापेक्षा रात्र अधिक शक्तिशाली असते कारण अंधार म्हणजे फक्त अनुपस्थिती. अंधार आहे असे म्हणणे चुकीचे आहे. प्रकाश अनुपस्थित आहे आणि त्या अनुपस्थितीत जबरदस्त उपस्थिती आहे. इथेही असेच होऊ शकते.

तुमच्या स्वतःच्या चेतनेमध्येही, जेव्हा तुम्ही ध्यानस्थ होता, याचा अर्थ तुम्ही अनुपस्थित आहात. जेव्हा तुम्ही अनुपस्थित असता तेव्हा तुमची उपस्थिती जबरदस्त असते. जेव्हा तुम्ही उपस्थित राहण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमची उपस्थिती अजिबात नसते. अहंकाराचे अस्तित्व नसते. पण जेव्हा तुम्ही अनुपस्थित असता तेव्हा जबरदस्त उपस्थिती असते. अमावस्येलाही तेच आहे. हळूहळू, चंद्र नाहीसा होतो, आणि त्या अनुपस्थितीमुळे एक विशिष्ट शक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे अमावस्या महत्त्वाची मानली जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com