LIC एजंटने व्यापाऱ्यास घातला दीड कोटीचा गंडा
निकेश शार्दुल (ठाणे)
आपल्या ओळखीच्या बड्या बँक अधिकाऱ्यावर विश्वास ठेऊन मोठी गुंतवणूक करणे एका व्यापाऱ्याला चांगलेच महाग पडले आहे. LIC पॉलिसीत गुंतवणूक करत मोठ्या परताव्याचे अमिष दाखवत भिवंडीतील एका कपडा व्यापाऱ्याला दीड कोटींचा गंडा घातला गेल्याचा गुन्हा दाखल झाल्याने बँक अधिकारी आणि LIC एजन्ट्स च्या विश्वासाहर्तेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.
भिवंडीचे कपडा व्यापारी नरसय्या गजूला यांनी 2011 साली सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बांद्रा BKC शाखेतून घर गहाण ठेऊन दोन कोटींचे कर्ज घेतले. सदर शाखेचे ब्रांच मॅनेजर बाळकृष्ण अय्यर यांच्याशी गजूला यांचे चांगले संबंध प्रस्थापित होताच अय्यर यांनी LIC एजेंट असलेल्या आपल्या पत्नी कडून विमा उतरविण्याचा आग्रह धरला. केवळ नऊ वर्षात दुप्पट परतावा देण्याचे अमिष दाखवत स्वतः नरसाय्या गजूला, त्यांच्या पत्नी व दोन्ही मुलांच्या नावे प्रत्येकी पंचवीस लाखांचा म्हणजे एकूण एक कोटींचा विमा उतरवीला. सदर पॉलिसीची केवळ पावती देऊन इतर कागदपत्रं अय्यर यांनी स्वतःकडे ठेऊन दोन महिन्यातच गजूला यांच्या नकळत पॉलिसी LIC कडे जमा केली व त्यातून गजूला यांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम खोट्या सह्या करून एका खोट्या खात्यात वळती केली. याची कोणतीच माहिती नसलेल्या गजूला यांना जेव्हा हा सगळा गैरप्रकार कळला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ ठाण्यातील आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेत बँक मॅनेजर बाळकृष्ण अय्यर आणि इतरांविरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंदविला असुन या प्रकरणी ठाणे पोलीस अधिक तपास करत आहेत.