Sangli Crime : सांगलीत "खून का बदला खून से"! वडिलांच्या हत्येचा बदला घेत तब्बल आठरा वार केले, अन्...
सांगली शहरात आज सकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या एका थरारक घटनेने खळबळ उडवली आहे. शहरातील भाजीपाला होलसेल व्यापारी महेश प्रकाश कांबळे (वय 40, रा. आंबा चौक, इंदिरा हौसिंग सोसायटी, यशवंतनगर, सांगली) याचा शंभरफुटी रस्त्यावर कोयत्याने आठरा वार करत निर्घृण खून करण्यात आला. माहितीनुसार, कांबळे याच्यावर काही वर्षांपूर्वी भाजी विक्रेता फिरोज ऊर्फ बडे शेरअली शेख याच्या हत्येचा आरोप होता. 30 नोव्हेंबर 2021 रोजी दोघांमध्ये आर्थिक वादातून हा खून झाला होता. त्यानंतर कांबळे याला 2023 मध्ये जामिनावर सोडण्यात आले होते.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, फिरोज शेख याचा मुलगा मुजाहिद शेख आणि त्याच्या एका साथीदाराने वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केला. कांबळे याच्या मागावर असलेल्या दोघांनी आज सकाळी तो शंभरफुटी रस्त्यावरील दुचाकी शोरूमसमोर थांबला असताना, त्याच्यावर अचानक कोयत्याने सपासप वार केले. डोक्यावर, कपाळावर आणि पोटावर एकूण 18 गंभीर वार करण्यात आले. कांबळे याला तत्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी मृताचे नातेवाईक विजय कांबळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, निरीक्षक संजय मोरे आणि एलसीबी निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाचे आदेश दिले आहेत. एलसीबी आणि शहर पोलिसांच्या दोन पथकांनी संशयितांचा शोध सुरू केला असून, त्यापैकी एक पथक कर्नाटकात छापेमारी करत आहे. या घटनेमागे अनैतिक संबंधांचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. महेश कांबळे याने व्यवसाय पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जुन्या वादातून हा हिंसक हल्ला घडल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात यापूर्वीही वादातून खुनाच्या घटना घडल्या असून, ही त्यात भर पडणारी आणखी एक भीषण घटना ठरली आहे. सांगलीसह संपूर्ण राज्यात वाढत्या खून, हल्ले आणि मारामारीच्या घटनांनी गंभीर चिंता निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य पोलिस यंत्रणेपुढे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.