५ दिवसांवर मुलीचं लग्न: वडिलांनी केली आत्महत्या
औरंगाबाद येथे संग्राम नगरजवळ नवरी मुलगी पाच दिवसांवर लग्न आलं असताना घरातून पळून गेली. समाजात आपली बदनामी होईल या भीतीपोटी मुलीच्या वडिलांनी शनिवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून दरम्यान सुसाइड नोटमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही या घटनेमुळे औरंगाबाद मध्ये खळबळ उडाली आहे.
१९ नोव्हेंबरला त्याच्या मुलीचं लग्न होणार होतं. घरात आनंदाचं वातावरण होतं. लग्नाची पूर्ण तयारीही झाली होती. आणि सर्व नातेवाइकांना लग्नाचे निमंत्रणही देण्यात आले होते. कॅटरिंगची व्यवस्थाही करण्यात आली होती. आणि लग्न तोंडावर आले असताना, मुलगी घर सोडून निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, ती कुठेही सापडली नाही. चिंतेत असलेल्या कुटुंबीयांनी सातारा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान लग्न जवळ आलं असताना मुलगी घर सोडून गेल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हे दुःख सहन न झाल्याने आणि समाजात बदनामी होईल या भीतीने ४८ वर्षीय वडिलांनी घराजवळच आत्महत्या केली.
दरम्यान जवाहर नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील हे घटनास्थळी पोहोचले. मृताच्या पँटच्या खिशातून त्यांना एक चिठ्ठी मिळाली. पत्नीच्या नावाने त्यांनी ही चिठ्ठी लिहून ठेवली होती. मी हे जग सोडून जात आहे. माझ्या मृत्यूनंतर मुलीला कधीच घरी येऊ देऊ नकोस. माझ्या मुलाचे लग्न धुमधडाक्यात करशील. तुझी कायम आठवणीत राहशील. मात्र, मुलीला माझ्या घरात कुठलीही जागा नाही, असे त्या चिठ्ठीत लिहून ठेवले होते.