नवरात्री उपवासासाठी भगर खाल्ल्याने एकाच कुटूंबातील ६ जणांना विषबाधा
जालन्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवरात्रीनिमित्त उपवास असल्याने कुटुंबाने भगर खाल्ली. यामुळे एकाच परिवारातील ६ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. अशा घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
आजपासून देशभरामध्ये नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली. प्रत्येक राज्यात मोठ्या भक्तीभावाने नवरात्री उत्सव सण साजरा केला जातो. पण जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये एकाच परिवारातील ६ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. आज सकाळी या सर्वांनी एकाच वेळी फराळ केला. त्यानंतर त्यांना त्रास होवू लागला. यामुळे गावातील रहिवाश्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सध्या यातील ५ जणांची प्रकृती स्थिर आहेत तर एका महिलेला औरंगाबाद येथील वडीगोद्री येथे साई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहेत.दरम्यान, भगरमध्ये काही विषारी पदार्थ होता का? याची आता तपासणी करण्यात येणार असून सर्व नागरिकांनी कोणतेही पदार्थ विकत घेताना किंवा खाताना ते खाण्यायोग्य आहे किंवा नाही याची पडताळणी करावी. आणि मग याचे सेवन करावे.