Misha Agrawal : ...म्हणून मिशा अग्रवालने आयुष्य संपवलं? मृत्यूचं धक्कादायक कारण समोर
काही दिवसांपूर्वी 24 वर्षीय सोशल मीडिया इंफ्लूएंसर मिशा अग्रवालचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. वाढदिवसांच्या 2 दिवस आधीच तिने जगाचा निरोप घेतल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले. नैराश्य आल्याने मिशाने आयुष्य संपवल्याचे समोर आले होते. मात्र आता तिच्या आत्महत्येचे खरे कारण समोर आले आहे.
मिशा अग्रवालच्या बहिणीने तिच्या सोशल मीडिया आकाऊंटवरुन मिशाच्या आत्महत्येचे कारण सांगितले आहे. तिने याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये मिशाच्या फोनचा वॉलपेपर दिसत आहे. या वॉलपेपरमध्ये मिशाची इन्स्टाग्राम प्रोफाइल आणि त्यात 10 लाख फॉलोअर्सचा आकडा असं दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत मिशाच्या बहिणीने एक पोस्टदेखील लिहिली आहे. तिने लिहिले कि, "मिशाच्या फोनचा वॉलपेपर खूप काही सांगून जातो. हे तिच्या आयुष्याच एकमेव लक्ष्य होतं. इन्स्टाग्रामचं जग हे खरं जग नाही. तसेच फॉलोअर्सदेखील खरं प्रेम नाही. हे सर्वांनीच समजून घ्या".
पुढे तिने लिहिले की, "माझ्या धाकट्या बहिणीनं इंस्टाग्राम आणि तिच्या फॉलोअर्सभोवतीच तिचं जग निर्माण केलं होतं. 10 लाख फॉलोअर्स करणं हे तिचं एकमेव लक्ष्य होतं. मात्र ज्यावेळी तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले त्यावेळी ती अस्वस्थ झाली आणि तिला खूप वाईट वाटू लागलं. आपण काहीच करू शकत नाही, अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली. एप्रिलपासून ती खूप दुःखी होती. ती अनेकदा मला मिठी मारून रडायची. माझे फॉलोअर्स कमी झाले तर मी काय करेन? माझं करियर संपून जाईल, असेही ती म्हणायची".
नंतर तिने लिहिले की, "मी मिशाला धीर देण्याचा प्रयत्न केला. तिला मी वारंवार समजावून सांगितलं की हे तिचं संपूर्ण जग नाही. हा फक्त एक साईड जॉब आहे आणि जर ते काम करत नसेल तर हा काही शेवट नाही. मी तिला तिच्या प्रतिभेची, तिच्या एलएलबी पदवीची आणि पीसीएसजेची तयारीची आठवण करून दिली. तिला सांगितलं की ती एक दिवस न्यायाधीश होईल आणि तिला तिच्या करिअरची काळजी करण्याची गरज नाही. मी मिशाला सल्ला दिला की, इन्स्टाग्रामकडे फक्त मनोरंजन म्हणून पाहा. मी तिला तिच्या आनंदावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं तसेच चिंता आणि नैराश्य सोडून देण्यास सांगितलं."
पुढे मिशाच्या बहिणीने लिहिलं की, "मात्र दुर्दैवानं माझ्या धाकट्या बहिणीनं माझं ऐकलं नाही आणि ती इंस्टाग्राम आणि फॉलोअर्समध्ये इतकी हरवून गेली की, ती कायमची आपल्या जगाचा निरोप घेऊन गेली. ती इतकी निराश झाली की तिनं स्वतःचा जीव घेतला ज्यामुळे आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं."