Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर पुन्हा लुटमारीची घटना , प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर पुन्हा लुटमारीची घटना , प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

समृद्धी महामार्ग: प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता वाढली, लुटमारीच्या घटना पुन्हा चर्चेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. छत्रपती संभाजीनगर ते नागपूर दरम्यानच्या मार्गावर रात्रीच्या सुमारास वाहनांवर दगडफेक करून लुटमार करण्याच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ नेत्या रोहिणी खडसे यांनी त्यांच्या X हँडलवर शेअर केल्यानंतर हा मुद्दा गाजू लागला आहे.

दगडफेक करून लुटीचा प्रयत्न

व्हायरल व्हिडिओमध्ये अज्ञात व्यक्ती बोगद्यात वाहनांवर दगडफेक करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ही एक 'मोडस ऑपरेंडी' असून, वाहन थांबवून त्यावर लूट करण्याचा उद्देश असतो. मात्र संबंधित व्हिडिओ नेमक्या कोणत्या तारखेचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रविवारी व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर सोमवारी तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. एका घटनेत चालकाने प्रसंगावधान राखत वाहन न थांबवता पुढे नेल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. परंतु अशा घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

महामार्गावर सुरक्षेचे उपाय अपुरे?

MSRDC च्या माहितीनुसार, प्रत्येक पॅकेजमध्ये ठरावीक वेळेसाठी गस्त करणारी सुरक्षा वाहने, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १० सदस्यीय पथक, रुग्णवाहिन्या आणि क्विक रिस्पॉन्स व्हेईकल (QRV) उपलब्ध आहेत. मात्र असे असूनही अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. महामार्गावर एखाद्या प्रवाशाने लूटमारीची तक्रार दिल्यास, ती हायवे सुरक्षा पोलिसांमार्फत स्थानिक पोलिस ठाण्यात नोंदवावी लागते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

समृद्धी मार्गासाठी छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर आणि जालना जिल्ह्यातील एकूण ८६ गावांमधून भूसंपादन करण्यात आले आहे. या भागांमध्येच बहुतेक लुटमारीच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः हर्सूल-सावंगी, लासूर स्टेशन, माळीवाडा, वैजापूर व बोगद्यांच्या आसपास अशा घटना वारंवार घडत आहेत. या प्रकारांमुळे महामार्गावर रात्रीचा प्रवास धोकादायक ठरत असून, स्थानिक नागरिक व प्रवासी यांच्याकडून रात्री गस्त वाढवणे, सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावी करणे, आणि आपत्कालीन प्रतिसाद वेळ कमी करणे, या गोष्टींवर भर देण्याची मागणी केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com