Chhatrapati Sambhajinagar : तासाभरात येतो सांगुन गेला अन् पुलाखाली मृतदेह आढळला! गाडीची अवस्थाही फुटलेली, नेमक प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका उद्योजकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एक तासाभरात येतो असे आपल्या पत्नीला सांगून गेलेल्या उद्योजकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी पुलाखाली आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून नक्की हा नैसर्गिक मृत्यू आहे की खून याचा शोध घेतला जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये करोडी टोलनाक्याजवळ 37 वर्षीय सागर परळकर या उद्योजकाचा मृतदेह सापडल्याने त्या परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. सागर रामभाऊ परळकर वाळूज MIDC मध्ये पार्टनरशिपमध्ये पुष्पक ऍग्रो कंपनीत संचालक पदावर होता. तो आपल्या पत्नी आई आणि दोन मुलांसह कांचनवाडीमध्ये राहायचा. सागर आदल्या दिवशी आपल्या कंपनीच्या कामासाकरिता बाहेर गेला होता. रात्री 9च्या सुमारास त्यांच्या पत्नीने त्यांना फोन केला असता मी तासाभरामध्ये घरी येतो असे त्यांनी सांगितले.
मात्र रात्रीचे 12 वाजले तरी सागर घरी न परतल्याने घरचे लोक घाबरले. घरच्यांनी आणि त्याच्या मित्रांनी रात्रभर त्याचा शोध घेतला मात्र सागर कुठेच सापडला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी दुपारी त्याचा मृतदेह करोडी टोलनाक्यानजीक पुलाखाली सापडला. हि बातमी कळताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. तात्काळ घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी सागरचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
मृतदेहाशेजारी पडलेल्या आधारकार्डावरून आणि मोबाईलवरून सागरची ओळख पटवण्यात आली. तसेच बाजूला त्याची दुचाकी सुद्धा तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर मधील पोलीस अधिक तपास करत असून नेमका सागरचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान हा सर्व घटनाक्रम पाहता हा मृत्यू नसून ही हत्या असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.