Mulund Bridge Accident: बेपर्वा ब्रिजकामाचा कहर! लोखंडी पिलर कोसळून कारचे नुकसान
मुलुंड, मुंबईत सुरू असलेल्या विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षिततेशी सर्रास खेळ सुरू असल्याचे आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. येथे सुरू असलेल्या ब्रिजकामादरम्यान कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना लोखंडी तुकडा थेट एका कारवर कोसळल्याने मोठा अपघात टळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे कंत्राटदारांच्या निष्काळजीपणावर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भांडूप पश्चिम येथे राहणारे धनेश बाबूराम यादव (वय ३१) हे १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री मित्रांसह मुलुंड परिसरातून घरी परतत होते. यावेळी पिलर क्रमांक २८ जवळ सुरू असलेल्या ब्रिजकामातून अचानक लोखंडी भाग त्यांच्या फॉर्च्युनर कारवर कोसळला. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी ना बॅरिकेड्स होते, ना दिशादर्शक फलक, ना सुरक्षा रक्षकांची व्यवस्था होती. तरीही रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला होता.
घटनास्थळी एस.पी.एस. कन्स्ट्रक्शन कंपनीचे कर्मचारी काम करत असल्याची माहिती आहे. तक्रारदारांच्या आरोपानुसार, हलवली जात असलेली लोखंडी शिडी तुटून थेट कारवर पडली. या निष्काळजीपणामुळे क्षणात अनर्थ घडू शकला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेनंतर धनेश यादव यांनी संबंधित कामगार आणि कंत्राटदारांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. “बेपर्वाईमुळे एखाद्याचा जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या मते, विकासकामांच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत.
मुंबईत विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांमध्ये सुरक्षा नियमांचा बोजवारा, कंत्राटदारांची मनमानी आणि प्रशासनाची ढिलाई यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आता प्रश्न एकच आहे—या निष्काळजीपणासाठी दोषींवर कठोर कारवाई होणार की पुन्हा एकदा हे प्रकरण दडपले जाणार?
